राज्यातील वंचित बहुजन आघाडीच्या महत्त्वाच्या नेत्यांसह ४७ जणांनी दोनच दिवसांपूर्वी राजीनामे दिले होते. आता मुंबईतदेखील वंचित बहुजन आघाडीत मोठी फूट पडली आहे. मंबईमधील वंचितचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी यांच्यासह एकूण ५०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे वंचितमध्ये मोठी खिंडार पडली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील सर्व जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी अशा एकूण ५०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत विक्रोळी पश्चिमेकडील कैलास कॉम्प्लेक्स सभागृहात झालेल्या कार्यक्रमात वंचितच्या कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपला पर्याय निर्माण करण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न आहे. मात्र, अकोला पाठोपाठ मुंबई आणि उपनगरांतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सामूहिक बंडामुळे प्रकाश आंबेडकरांच्या या प्रयत्नांना खीळ बसल्याचे चित्र दिसत आहे.
माजी आमदार बळीराम सिरस्कार आणि हरिदास भदे यांची वंचितला सोडचिठ्ठी
गेल्या अनेक वर्षांपासून भारिप बहुजन महासंघ त्यानंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये काम केलेल्या दोन माजी आमदारांसह ४८ पदाधिकाऱ्यांनी पक्षाध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. या राजीनामासत्राने ‘वंचित’ला मोठा खिंडार पडली आहे. पक्षाची विश्वासार्हता संपल्याने आम्ही सामूहिक राजीनामा देत असल्याचे पत्र माजी आमदार बळीराम सिरस्कर व माजी आमदार हरिदास भदे यांनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडे पाठवून खळबळ उडवून दिली आहे.