औरंगाबादमध्ये ६७ विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. पडेगावच्या कासम बरी दर्गा परिसरातील एका मदरशामध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या मदरशामधील विद्यार्थिनींना मंगळवारी रात्री सिल्लेखाना येथे सलमान कुरैशी यांनी दावत दिली होती. या जेवणातून विद्यार्थिनींना विषबाधा झाली. विद्यार्थिनींना मळमळ आणि उलट्यांसारखे त्रास होऊ लागल्याने त्यांना ताबडतोब घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यामधील दोन विद्यार्थींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तर यामधील काही विद्यार्थिनींवर उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. विषबाधेची माहिती कळताच औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मोठी गर्दी करण्यात आली होती.
अशी घडली घटना
पडेगाव परिसरात कासमबरी दर्गाजवळ राबिया बसरिया हा मुलींचा मदरसा आहे. येथील विद्यार्थिनींना समाजातील अनेक नागरिक छोट्या-मोठ्या कार्याक्रमातून दावत देत असतात. मंगळवारी सिल्लेखाना येथील सलमान कुरेशी यांच्याकडे मुलींना दावत होती. दावतमध्ये विद्यार्थिनींना बिर्याणी देण्यात आली होती. दावत झाल्यानंतर या विद्यार्थिनींना टेम्पोतून परत मदरश्यामध्ये सोडण्यात आले. मात्र काही वेळातच विद्यार्थिनींना उलटी, मळमळ, श्वास घेण्यास त्रास, थंडी वाजून आल्यासारखे वाटू लागले. विद्यार्थिंनीना होणारा त्रास पाहता स्थानिक नागरिकांच्या मदतीने या विद्यार्थिनींना घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. एकाचवेळी ६७ विद्यार्थिनींना त्रास झाल्यामुळे सगळ्यांची पळापळ झाली. घाटी रुग्णालयात एकाच बेडवर दोन विद्यार्थिनींना उपचार देण्यात आले.
उपचार करुन अनेकांना घरी सोडले
विद्यार्थिनींना विषबाधा झाल्यामुळे पालकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. त्यामुळे घाटी रुग्णालयात पालकांची गर्दी झाली होती. घाटीतील डॉक्टरांनी तातडीने विद्यार्थिनींवर उपचार केले. उपचारानंतर काही विद्यार्थिनींना घरी पाठवण्यात आले. तर यामधील दोन विद्यार्थिनींची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अनेक दरम्यान, आमदार इम्तियाज जलील आणि महापौर नंदकुमार घोडेले, आमदार सतीश चव्हाण यांनी घाटी रुग्णालयात धाव घेत विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. नेमकी विषबाधा कशामुळे झाली याचा तपास सध्या सुरु आहे.