आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात काँग्रेसला मोठा झटका लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात माजी खासदार निलेश राणे यांच्या विरोधात राज्यसभेचे खासदार हुसैन दलवाई किंवा अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा होती. मात्र काँग्रेस नेते माजी खासदार भालचंद्र मुणगेकर आणि खासदार हुसैन दलवाई यांचा या मतदार संघातून निवडणूक लढवण्यास नकार दिला असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. हे दोन्हीही उमेदवार मुंबई मतदार संघातून निवडणूक लढवण्यात उत्सुक असल्याचे सांगण्यात आले. कोकणातून निवडणूक लढवावी अशी पक्षाची इच्छा आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग क्षेत्रातून उमेदवार न सापडल्यास भंडारी समाजाचे अध्यक्ष नाविनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर या जागेसाठी राजेंद्र देसाई इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे.
उमेदवारीवर प्रश्नचिन्ह
खासदार हुसैन दलवाई किंवा अर्थतज्ञ भालचंद्र मुणगेकर या दोन नेत्यांची मतदारसंघामध्ये प्रतिमा उजळ आहे. दोघेही काँग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाने तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून निवडणूक लढवी ही मागणी केली जात होती. मात्र आता त्यांनी माघार घेतल्यामुळे येथील मतदार संघातून कोण निवडणूक लढवेल यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.