नगरचे माजी आमदार, माजी मंत्री व शिवसेनेचे उपनेते अनिलभैय्या राठोड यांच बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं. मृत्यूसमयी ते ७३ वर्षांचं होते. हिंदुत्ववादी विचारांच्या राठोड यांनी शिवसेनेची शाखा नगर शहरात स्थापन कारण्यापासून जिल्ह्यात तिची पाळेमुळे रोवली होती. नगर जिल्हा आणि शिवसेना म्हटले की अनिल राठोड यांचे नाव पुढे येत असे. त्यांनी शहरात आणि जिल्ह्यात शिवसेनेच्या असंख्य शाखा उघडल्या. शिवसेनेच्या पायाभरणीत त्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. त्यांच्या एका हाकेला ओ देत जिल्ह्यातून हजारो शिवसैनिक त्यांच्यामागे उभे राहात.
माजी मंत्री अनिल राठोड यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. विधानसभेत आम्ही अनेक वर्ष एकत्र होतो. ते सर्वसामान्यांसाठी लढणारे नेते होते. त्यांची लोकप्रियता अफाट होती. त्यामुळेच त्यांना दीर्घकाळ विधीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. pic.twitter.com/E7ub6HT3RM
— Ashok Chavan (@AshokChavanINC) August 5, 2020
नगरमध्ये विद्यमान आमदारांचा दोनवेळेचा अपवाद वगळता अद्यापपर्यंत कोणालाही दुसऱ्यांदा आमदारकीची संधी मिळाली नाही, मात्र जिल्ह्यात शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेल्या राठोड यांनी सलग पाचवेळा आमदारकी भूषविली आहे. त्यांच्या कामाची दखल घेत १९९० साली त्यांना आमदारकीचे तिकीट देण्यात आले. त्यावेळेपासून २०१४ पर्यंत सलग ५ वेळा सातत्याने चढत्या मताधिक्याने विजयी होणारे ते पहिलेच आमदार ठरले. त्यांची शिवसेनेवरची निष्ठा पाहून त्यांना १९९५ साली मंत्रिमंडळात घेण्यात आले. मनोहर जोशी यांच्या मंत्रिमंडळात अनिल राठोड यांनी अन्न व नागरी पुरवठा, राज्यमंत्री म्हणून काम केले.
२०१४ साली त्यांच्या पराभव झाल्यानंतर ते शिवसेनेत सक्रिय राहिले. शिवसेनेत त्यांची उपनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली होती. अगदी अलीकडच्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावात त्यांनी नगरमध्ये गोरगरिबांसाठी स्वतंत्र अन्नछत्र चालवले. अनेक ठिकाणी जीवनावश्य्क वस्तूंचा पुरवठा केला. गेल्याच आठवड्यात त्यांच्यासह पत्नी मुलगा व सुनेस कोरोनाची लागण झाली. त्यात त्यांना नूमोनिया झाल्याचे पुढे आले. मंगळवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा जाणवत असतानाच बुधवारी पहाटे त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.
अनिल राठोड यांच्या पश्चात पत्नी, २ मुली, एक मुलगा, सून व जावई असा परिवार आहे.