घरमहाराष्ट्रगणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना ७ ऑगस्टची डेडलाईन

गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना ७ ऑगस्टची डेडलाईन

Subscribe

१४ दिवस होम क्वारंटाईन रहावं लागणार

गणेशोत्सवासाठी मुंबई, पुण्यासह जिल्ह्याच्या बाहेरून रायगडात येणार्‍या चाकरमान्यांना ७ ऑगस्टपूर्वी दाखल व्हावे लागणार आहे. त्याचबरोबर त्यांना पुढचे १४ दिवस होम क्वारंटाईन रहावं लागणार आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी गणेशोत्सवासाठी परिपत्रक जारी केले आहे.

रायगड जिल्ह्यात १५ हजारांच्या आसपास नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यासह राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. गणेशमूर्तीच्या उंचीवरही निर्बंध घालण्यात आले आहेत. घरगुती गणेशमूर्ती २ फुटांची, तर सार्वजनिक गणेशोत्सवासाठी ४ फुटांपर्यंत उंचीची मूर्ती ठेवता येणार आहे. गणेशोत्सवासाठी कुणी स्वेच्छेने वर्गणी किंवा देणगी दिल्यास स्वीकारता येईल, मात्र घरोघरी जाऊन वर्गणी मागता येणार नाही. भपकेबाज जाहिराती किंवा पोस्टरबाजी करू नये, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

गणेश मंडपात निर्जंतुकीकरणाबरोबरच सॅनिटायझिंग, थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असावी, तसेच दिवसातून किमान ३ वेळा मंडपाचे सॅनिटाझेशन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारने गणेशोत्सवासाठी घालून दिलेल्या नियमांच्या अधीन जिल्हाधिकारी चौधरी यांनी शुक्रवारी परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार होम क्वारंटाईनबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. होम क्वारंटाईन आदेशच्या अंमलबजावणीची जबाबदारी कोरोना प्रतिबंधक समिती आणि सरपंच यांची राहील.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -