घरCORONA UPDATEआता अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्यपाल-राज्य सरकार आमने-सामने!

आता अंतिम वर्षांच्या परीक्षांवरून राज्यपाल-राज्य सरकार आमने-सामने!

Subscribe

राज्यातील विद्यापीठ आणि कॉलेजांमधील अंतिम वर्षाच्या परीक्षेबाबत तातडीने निर्णय घेण्याची सूचना आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला केली. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित त्यांनी ही सूचना केली आहे. ही सूचना करतानाच त्यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाकडे परीक्षा रद्द करण्यासंदर्भात केलेल्या मागणीला देखीला आपला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे भविष्यात राज्यपाल कोश्यारी विरोधात शिवसेना असा वाद पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

देशभरात वाढत असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता भारतातील विद्यापीठ कॉलेजांच्या परीक्षांसंदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकतीच मार्गदर्शक तत्वे जाहीर केली होती. या तत्वानुसार राज्य सरकारने नेमलेल्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार राज्यातील विद्यापीठ आणि कॉलेजांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्यासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली होती. मात्र राज्यात वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोगाला पत्र लिहित अंतिम वर्षाच्या परीक्षा ही रद्द करण्याची मागणी केली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष युजीसीच्या निर्णयाकडे लागून राहिले होते. मात्र या पत्राला आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विरोध दर्शविला आहे.

- Advertisement -

यासंदर्भात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता परीक्षांसंदर्भात निर्णय घेण्याची सूचना केली आहे. तर उदय सामंत यांनी केलेली मागणी म्हणजे युजीसीच्या मार्गदर्शक तत्वांच्या विरोधी असल्याचे देखील त्यांनी या पत्रात म्हटले आहे. तर उदय सामंत यांची ही मागणी युजीसीच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यासारखे असून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ चे उल्लघंन करणारी असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. त्याचप्रमाणे ही मागणी करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी याबद्दल आपल्याला माहिती दिली नसल्याचा देखील आरोप केला आहे.

राज्यापालांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या या पत्रात अंतिम परीक्षेचे महत्व देखील नमूद केले आहे. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा न घेतल्यास त्याचा उच्च शिक्षणावर परिणाम होण्याची भीती देखील यावेळी वर्तविण्यात आली आहे. तर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने राज्य शिक्षण मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसई यांच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेताना सवलत दिली असल्याकडे राज्यपालांनी लक्ष वेधले. तर त्याबरोबर युजीसीने लॉकडाऊन असताना देखील परीक्षा कशा स्वरुपात घ्याव्यात याबद्दलच्या सूचना दिल्या असल्याचे देखील यावेळी अधोरेखित केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -