मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यातील मतभेद काही नवे नाहीत. आता पुन्हा एकदा राज्यातील विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षांच्या परिक्षा रद्द करण्याच्या कारणावरून या दोघांमध्ये मतभेद झाल्याचे पाहायला मिळत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोनच दिवसांपूर्वी राज्यातील विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षांच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर राज्यपाल कोश्यारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्यादृष्टीने हा निर्णय रद्द करत विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
यासंदर्भात मंगळवारी राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहिले. दोन दिवसांपूर्वी विद्यापीठ स्तरावरील अंतिम वर्षाच्या परिक्षा न घेता विद्यार्थ्यांना सरासरी पद्धतीने गुण देऊन त्यांना पास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी जाहीर केल्याचे प्रसारमाध्यमातून कळाल्याचे राज्यपालांनी निदर्शनास आणून देताना हा निर्णय अनपेक्षित आणि आश्चर्यकारक असल्याचे पत्रातून सांगितले. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांच्या भविष्यावर परिणाम होईल असेही ते या पत्रात म्हणाले.
परिक्षेच्या संदर्भात अहवाल तयार करण्याची जबाबदारी विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या समितीला सोपवण्यात आली असून राज्यपाल कोश्यारी यांनी या समितीलाही पत्र लिहून जाब विचारला आहे. याशिवाय आर्किटेक्ट, मेडिकल, कायदा आदी कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना परिक्षेत पास झाल्यानंतर पुढील व्यावसायिक कामकाजासाठी परवाना दिला जातो. त्यांना परीक्षेविनाच परवाना दिल्यास त्याचे दूरगामी परिणाम होतील अशी भीतीही राज्यपालांनी व्यक्त केली.