आंतरजातीय प्रेमसंबंधांना पालकांचा विरोध असणे हे आता काही नवीन राहिले नाही. मात्र तरुण-तरुणी या विरोधात आता खुलेआम बंड करू लागली आहेत. अशीच एक घटना पुण्यातील प्रेमी जोडप्यांची समोर आली आहे. आंतरजातीय प्रेमप्रकरणाला विरोध करणाऱ्या जन्मदात्या आई-वडिलांकडूनच जीवाला धोका असल्याचा आरोप करत १९ वर्षीय प्रियांका शेटे या तरुणीने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. विशेष म्हणजे हायकोर्टानेही या याचिकेची दखल घेत तळेगाव पोलिसांना मुलीची रितसर तक्रार नोंदवून तिच्या सुरक्षेचे उपाय करण्याचे निर्देश दिले आहेत. या तरुणीतर्फे दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज, मंगळवारी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली. अहमदनगरमध्ये आंतरजातीय विवाह गेल्यामुळे मुलगी आणि जावयाला जाळून टाकण्याचा प्रकार ताजा असताना पुण्यातील आणखी एक आंतरजातीय प्रेमप्रकरण चर्चेत आलं आहे.
तुम्ही हे वाचलंत का? – पोलीस असल्याचं सांगितलं आणि लग्न करून मोकळा झाला!
दोघांच्याही जीवाला धोका
पुण्यातील तळेगावानजीक नवलाख उंबरे या गावात राहणाऱ्या प्रियांका शेटे या महाविद्यालयीन तरुणीने स्वतःचा आणि प्रियकराचा जीव वाचवण्याची मागणी करत अॅड. नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली आहे. तरुणीचे दुसऱ्या जातीतील एका युवकावर प्रेम आहे. विराज अवघडे हा दुसऱ्या समाजातील असल्याने या प्रेमसंबंधांना आणि लग्नाला तिच्या आई-वडिलांचा तसेच इतर नातेवाईकांचा विरोध आहे. लग्न केलं तर नातेवाईकांकडून आपल्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती प्रियांकाने या याचिकेत व्यक्त केली आहे. या प्रकरणी घरच्यांच्या त्रासाला कंटाळून प्रियांकाने एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे.
Nitin Satpute, Lawyer: Priyanka was in a relationship with a boy from a Scheduled Caste which her family didn't approve of. Bombay High Court has given directions that the girl registers her statements with the police, and that police provides protection to the couple. #Mumbai pic.twitter.com/ZHEbaHn9RC
— ANI (@ANI) May 7, 2019
काय आहे याचिकेत
संबंधित तरुण गरीब असला तरी त्याच्याबरोबर मी सुखी राहीन आणि सज्ञान असल्याने मला कोणाबरोबर राहायचे याचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे. असं या याचिकेतून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आई-वडिल आणि अन्य नातेवाईकांकडून संरक्षण मिळावे तसेच मनाप्रमाणे जगण्याचा मूलभूत अधिकार मिळावा, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. तसेच तिला घराकडे डांबून ठेवणाऱ्यांवरही तातडीने कारवाई करावी, अशी मागणीही याचिकेतून करण्यात आली आहे.