राज्यातील अनेक भागात परतीच्या पावसाने गुरुवारी (१५ ऑक्टोबर) हाहाकार माजवला. दरम्यान, पावसाचा जोर आजही कायम राहणार असून शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) कोकण विभागात मुसळधार, तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. पावसाचा जोर शनिवारी (१७ ऑक्टोबर) ओसरणार आहे.
बंगालच्या उपसागरातून आलेल्या आणि अरबी समुद्राच्या दिशेने निघालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने महाराष्ट्रातून जात असताना मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाने कहर केला आहे. बुधवारी पावसाने मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राला तडाखा दिला. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे. पुण्यात तर गाड्या वाहून गेला. पावसाचा जोर आजही कायम असणार आहे. काही ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १६ ऑक्टोबरला मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यंमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.