घरमहाराष्ट्रशिर्डीच्या ५०० कोटी देणगीला; हिंदु जनजागृती समितीचा विरोध

शिर्डीच्या ५०० कोटी देणगीला; हिंदु जनजागृती समितीचा विरोध

Subscribe

शिर्डी येथील श्री साई संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारला शिर्डीतील साई संस्थानकडून व्याजमुक्त ५०० कोटींचं कर्ज दिलं आहे. मात्र सुरेश हावरे हे देवस्थानचे विश्‍वस्त आहेत कि मालक असा संतप्त सवाल हिंदु जनजागृती समितीने केला आहे.

शिर्डी येथील श्री साई संस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश हावरे यांनी नुकतेच शासनाला सिंचन प्रकल्पाच्या कामांसाठी ५०० कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. ना व्याज, ना मुदत, ना कशाची हमी. आधीच कर्जाच्या बोज्याखाली असलेल्या राज्याकडून हे कर्ज फिटण्याची अपेक्षा करणे, म्हणजे चमत्कारच मानावा लागेल. अशा प्रकारे व्यावहारिक दृष्ट्याही असे कर्ज कोणी देत नाही. हे कर्ज नव्हे, तर ५०० कोटींचे दानच हावरे यांनी शासनाच्या पदरात टाकले आहे. शासनाच्या वशिल्यावर श्री साई संस्थान ट्रस्टचे विश्‍वस्त बनलेल्या हावरे यांना ट्रस्टचा पैसा हा काय स्वतःच्या मालकीचा वाटत आहे काय? हावरे यांनी हे लक्षात ठेवावे की, ते विश्‍वस्त आहेत, ट्रस्टचे मालक नव्हे! साईभक्तांनी श्री साईचरणी अर्पण केलेले धन हावरे यांनी कोणाला विचारून शासनाला कर्ज म्हणून दिले? असा परखड प्रश्‍न हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी केला आहे. याचे उत्तर हावरे यांनी साईभक्तांना द्यायलाच हवे, असेही घनवट यांनी म्हटले आहे.

मंदिरांचे विश्‍वस्त देवनिधीची लूट करतात

मंदिरांचे विश्‍वस्त ‘भक्त’ नसतील, तर देवनिधीची कशाप्रकारे लूट होते, याचे हे उत्तम उदाहरण आहे. शासनाला सिंचन प्रकल्पासाठी जर पैशांची आवश्यकता असेल, तर राज्य चालवणारा भाजप ६ हजार ३०० कोटी रुपयांचा स्वतःचा पक्षनिधी का वापरत नाही? पक्षनिधी हा पक्षासाठी वापरायचा असतो, हे कळते, तर मग देवनिधी देवासाठी वापरायचा असतो, हे कसे कळत नाही. तसेच देवनिधीची लूट हे महापाप असून ते लुटणार्‍यांना फेडावेच लागेल. सरकारने आतापर्यंत अनेकदा हिंदूंच्या मंदिरांचा पैसा घेतला; मात्र एकदाही वक्फ बोर्डाकडून किंवा ख्रिस्त्यांच्या संस्थांकडून दमडी घेण्याची हिंमत दाखवली नाही, असे का? आजवर हिंदूंनी इतका विरोध करूनही हिंदूंच्या विरोधाला न जुमानता हिंदु मंदिरांची ही लूट चालूच आहे. त्यामुळे आता हिंदु जनजागृती समिती हिंदूंनी मंदिरांमध्ये पैसे अर्पण न करता, ‘मंदिर सरकारीकरण रद्द करा, मंदिरांचा पैसा धर्मकार्यासाठी वापरा!’ अशा आशयाच्या चिठ्ठ्या टाकून निषेध आंदोलन चालू करणार असल्याचेही घनवट यांनी सांगितले.

- Advertisement -

वाचा – सरकारने शिर्डी संस्थानकडून घेतलं ५०० कोटींच कर्ज


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -