केंद्र सरकारने लॉकडाऊन ५ ची घोषणा केली असून, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांची ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा तसेच राज्यातील अर्थव्यवस्थेबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत असून, शरद पवार हे राज्यातील व्यवहार सुरू करावेत या मागणीवर ठाम असून, राज्यात लॉकडाऊन पाचमध्ये कशाप्रकारे शिथिलता देण्यात येईल याबद्दल दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. केंद्र सरकारने लॉकडाउनचा पाचवा टप्पा जाहीर केला आहे. राज्य सरकारला आता याबाबत मार्गदर्शक तत्वे तयार करावी लागणार आहेत. या टप्प्यात कोणत्या बाबींमध्ये शिथिलता देता येऊ शकते जेणेकरून जनजीवन हळूहळू पूर्ववत होईल आणि त्याचसोबत राज्याचे ठप्प झालेले अर्थचक्र पुन्हा सुरळित होईल याबददल दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते.
हे वाचा – कटेंनमेंट झोनमध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन; ८ जून पासून हॉटेल, धार्मिक स्थळे उघडणार
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणही गेले काही दिवस तापले होते. शरद पवार हे मुख्यमंत्री उदधव ठाकरे यांच्यासोबत सातत्याने बैठका घेत आहेत. राज्यातील लॉकडाउन संदर्भात दोघांमध्ये चर्चा होत असते. गेल्या आठवडयात शरद पवार यांनी मातोश्री येथे जाउन गुप्तभेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चा सुरू झाल्या.राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार इथपर्यंत चर्चा सुरू होती. मात्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला राज्यातील सरकार पाडण्यात कोणताही रस नाही. महाविकास आघाडी सरकार हे अंतर्गत विरोधामुळेच कोसळेल असे स्पष्ट केले आहे.