घरमहाराष्ट्रकर्नाटकऐवजी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी राज्यातल्या अपयशाचा विचार करावा

कर्नाटकऐवजी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी राज्यातल्या अपयशाचा विचार करावा

Subscribe

कर्नाटकात कमळ फुलवायला चाललेल्या महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आधी स्वतःच्या अपयशाकडे लक्ष द्यावे, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.

आपल्या विभागात काय काम करायचे? हे ही दुसऱ्या मंत्र्यांना विचारणाऱ्या मंत्र्यांने कर्नाटक सरकारच्या भवितव्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या अपयशी कारभाराचा आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या झालेल्या नुकसानाचा विचार करावा, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांना लगावला आहे. चव्हाण म्हणाले की, “जलयुक्त शिवार घोटाळ्यामुळे राज्याचे आर्थिक नुकसान तर झाले आहेच. परंतु शेतकऱ्यांना दुष्काळात ढकलण्याचे काम राम शिंदे यांच्या विभागाने केले आहे. राज्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची वाढती संख्या ही या सरकारच्या अकार्यक्षम कारभाराचे प्रतिक आहे. कर्नाटकातल्या सरकारची चिंता करण्यापेक्षा या मंत्र्यांनी शेतकरी आत्महत्या, दुष्काळ यासारख्या राज्यातील ज्वलंत समस्यांकडे लक्ष द्यावे. कर्नाटकात सरकार चालवण्यासाठी काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते सक्षम आहेत”, असा निर्वाळा अशोक चव्हाण यांनी दिला.

भाजपने गाठला अनैतिकतेचा कळस

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून सत्तेचा प्रचंड गैरवापर सुरु आहे. येनकेन प्रकारे सत्ता मिळविण्यासाठी पैसा आणि सरकारी यंत्रणांचा गैरवापर हीच भाजपची कार्यपद्धती आहे. भाजपने अनैतिकतेचा कळस गाठला. संवैधानिक प्रक्रिया आणि लोकशाही प्रक्रियेवर भाजपचा विश्वास नाही, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून मोदी-शाह यांचा सत्तापिपासू चेहरा पूर्णपणे उघडा पडला आहे, असे चव्हाण म्हणाले.

- Advertisement -

भ्रष्टाचाराच्या पैशाने कर्नाटक सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न

गुजरातमध्ये आमदार फोडणे, उत्तराखंड, अरूणाचल प्रदेश, मणिपूर, गोवा, बिहार, जम्मू-काश्मीर, तामिळनाडू या सर्व प्रदेशांमध्ये राज्यपालासारख्या संवैधानिक संस्थांचा गैरवापर करून सरकार स्थापन्याचे प्रयत्न करणे. सत्तेचा दुरुपयोग करून आमदार फोडणे. पैशाचा प्रचंड वापर करून विविध राज्यातील सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न मोदी-शाह यांनी केलेला आहे. कर्नाटक सरकार अस्थिर करण्याकरिता महाराष्ट्रात भ्रष्टाचार करून कमावलेला पैसा वापरला जात आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला. राज्यात कोणत्या मंत्र्याच्या बंगल्यामध्ये बैठका होतात. पंचतारांकीत हॉटेलमध्ये बैठकात काय होत आहे? हे सर्व आमच्या समोर आहे. कर्नाटकात काँग्रेस सरकार स्थापन होण्यापूर्वीच या अनैतिक मार्गाचा वापर मोदी-शाह जोडीने यापूर्वीच केलेला आहे. या हुकुमशाही आणि फॅसिस्ट विचारधारेचा विरोध करून काँग्रेसचे सरकार पूर्णपणे स्थिर राहील. तसेच आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -