हिंगोलीत एका महिलेला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. एका ५० वर्षीय महिलेला चार नराधमाने लाकडी दांड्याने अमानुषपणे मारहाण केली आहे. महिलेला मारहाण करत महिलेच्या गुप्तांगामध्ये मिरचीची पुड टाकल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. याप्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमके काय घडले?
हिंगोली येथील सेनगाव तालुक्यातील जयपुर येथे एका ५० वर्षीय महिलेला लाकडी दांड्याने मारुन तिच्या गुप्तांगात मिरची पुड टाकुन अमानुष मारहाण केली आहे. संतोष विठ्ठल पंडीत, विकास वामन पंडीत, वामन महादु पंडीत, विठ्ठल महादु पंडीत हे मजुर या महिलेच्या घरामध्ये काम करत होते. मंगळवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास या चौघांनी या महिलेला एका क्षुल्लक कारणावरुन तू माजली आहेस असे म्हणत अश्लील भाषेत शिवीगाळ केला. तसेच तिला लाकडाच्या दांड्याने मारुन तिच्या गुप्तांगामध्ये मिरचीची पुड टाकल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच या महिलेला जीवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली. दरम्यान, या पिडीतेवर हिंगोलीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. मात्र अद्याप जयपुर गावातील संतोष विठ्ठल पंडीत, विकास वामन पंडीत, वामन महादु पंडीत, विठ्ठल महादु पंडीत या चौघांना अटक करण्यात आले नाही.