घरमहाराष्ट्रलातूर हत्या प्रकरण; पालकमंत्र्यांचा बॉडीगार्ड निघाला 'सुपारी किलर'

लातूर हत्या प्रकरण; पालकमंत्र्यांचा बॉडीगार्ड निघाला ‘सुपारी किलर’

Subscribe

२० लाखांची सुपारी देऊन लातूरमधील स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी कुमार मॅथ्सचा संचालक चंदन कुमार शर्मासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

लातूरमधील अविनाश चव्हाण या स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासेस संचालकाच्या हत्या प्रकरणामध्ये आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. लातूरचे पालकमंत्री असलेले संभाजी पाटील – निलंगेकर यांचा बॉडीगार्ड करणसिंह याला अविनाश चव्हाण यांच्या हत्येकरता २० लाखांची सुपारी दिल्याची माहिती आता समोर येत आहे. अविनाश चव्हाण हत्या प्रकरणात पोलिसांनी करणसिंगला अटक केली आहे. कोचिंग क्लासेसच्या स्पर्धेतून ही हत्या करण्यात आली आहे. लातूरमधील स्टेप बाय स्टेप क्लासेसचे संचालक असलेले अविनाश चव्हाण यांची कुमार मॅथ्सचा संचालक चंदन कुमार शर्मा याने २० लाखांची सुपारी देऊन हत्या केली आहे. याप्रकरणी चंदन कुमार शर्मासह ५ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांनी करणसिंहला हत्येसाठी दिलेले २ लाख रूपये देखील जप्त केले आहेत. या साऱ्या घटनेने संपूर्ण लातूर हादरून गेले आहे. सध्या तरी करणसिंग संभाजी पाटील – निलंगेकर यांच्या काम करत नसून त्याने यापूर्वीच संभाजी पाटील – निलंगेकर यांच्याकडे काम करणे बंद केले आहे. व्यावसायिक स्पर्धेतून हत्या झाल्याने संपूर्ण लातूर शहर हादरून गेले आहे.

केव्हा झाली हत्या

२२ जूनला रात्रीच्या वेळी स्टेप बाय स्टेप कोचिंग क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कामे आटपून घरी परतत असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. दरम्यान, व्यावसायिक स्पर्धेतून हत्या करण्यात आली असावी असा संशय व्यक्त केला जात होता. त्यानंतर पोलिसांनी कुमार मॅथ्सचा संचालक चंदन कुमार शर्मासह ५ जणांना अटक केली आहे. चंदन कुमार शर्मा आणि अविनाश चव्हाण हे यापूर्वी पार्टनर देखील होते. पण, वाढत्या स्पर्धेतून अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यात आली आहे. गेल्या वर्षी फिटनेस सेंटरच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लिओनी लातूरमध्ये आली होती. शिवाय, क्लासमधील गुणवंत विद्यार्थ्यांना १ कोटी रूपयांची बक्षिसे वाटल्याच्या चर्चेने देखील अनेकांचे डोळे विस्फारले होते. यामुळे अविनाश चव्हाण मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले होते. कोचिंग क्लासेसमधील वाढती स्पर्धेमुळे अविनाश चव्हाण यांना आपला जीव गमवावा लागला आहे.शिक्षणासाठी राज्यभरातील विद्यार्थी लातूरमध्ये येतात.त्यामुळे कोचिंग क्लासेसमध्ये दिवसेंदवस स्पर्धा वाढत आहे. त्यातूनच अविनाश चव्हाण यांची हत्या करण्यात आली आहे. कोचिंग क्लासेसमध्ये असलेली जीवघेणी स्पर्धा हा सध्या राज्यभरात चर्चेचा विषय झाला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -