घरमहाराष्ट्रकोरेगाव-भीमाप्रकरणी माहिती लपवण्याचा केंद्र सरकारचा डाव

कोरेगाव-भीमाप्रकरणी माहिती लपवण्याचा केंद्र सरकारचा डाव

Subscribe

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची टीका

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात माहिती लपवण्याचा केंद्र सरकारचा डाव आहे. राज्य सरकारकडून तपास काढून घेणं अयोग्य असल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. जळगाव दौर्‍यावर असलेल्या पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भूमिकेवर मात्र सावध प्रतिक्रिया दिली आहे. कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद हे वेगवेगळे विषय आहेत. केंद्र सरकारने संबंध प्रकरण एनआयएकडे देणे, म्हणजे त्यांना काही गोष्टी झाकायच्या किंवा लपवायच्या आहेत. सत्य बाहेर येण्याची भीती इथल्या तत्कालीन सरकारला असावी, म्हणून दिल्लीच्या सरकारने मदतीला येत सर्व प्रकरण काढून घेतले. हे योग्य नसल्याचे पवार म्हणाले.

एकंदर परिस्थितीचा चुकीचा अर्थ लावून ज्यांचा संबंध नाही, त्या लोकांना केवळ लिखाण केले म्हणून आत टाकणे, त्यांच्यावर खटले भरणे, वर्षवर्ष त्यांच्यावर देशद्रोहासारखे गुन्हा दाखल करणे योग्य नाही, त्यासंबंधी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणीही शरद पवारांनी केली. कायद्यामध्ये केंद्र सरकारला एखाद्या प्रकरणाची चौकशी करण्याचा अधिकार आहे, हे मान्य आहे.

- Advertisement -

मात्र राज्याची संमती घेण्याची पद्धत आहे. राज्य सरकारला विश्वासात घ्यायला पाहिजे होते. कोरेगाव-भीमा प्रकरण घडले त्यावेळी फडणवीस सरकार होते. त्यामुळे या घटनेत काहीतरी लपवण्यासारखे असेल, म्हणूनच केंद्राने हा तपास एनआयएकडे दिला, अशी शंका शरद पवार यांनी उपस्थित केली.दोनच दिवसांपूर्वी शरद पवारांनी राज्य सरकारने तपास एनआयएकडे सुपूर्द केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. भीमा-कोरेगावबाबत तपासाचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे.

केंद्राने राज्य सरकारकडून तपास काढून घेणे योग्य नाहीच, मात्र राज्य सरकारने त्याला पाठिंबा देणे, हे त्यापेक्षा योग्य नाही, अशी नाराजी शरद पवार यांनी व्यक्त केली होती. कोल्हापूर दौर्‍यावर असलेल्या पवारांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत ठिगणी पडल्याच्या चर्चांना उधाण आले होते, त्यानंतर पवारांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

अजून चार वर्षे भविष्य खरं होणार नाही
महाविकास आघाडीचं सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी भाजपचे नेते कितीही करत असले तरी महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे पूर्ण करणार आहे. आम्ही खेड्यापाड्यात राहणारे लोक आहोत. आम्हाला ज्योतिष कळत नाही. ज्योतिष कळणारे लोक भाजपमध्ये जास्त आहेत. पण त्यांचे भविष्य खरे ठरत नाही आणि अजून चार वर्षे तरी त्यांचे भविष्य खरे होणार नाही, असा खोचक टोला शरद पवार यांनी भाजपला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -