नाशिकरोड ।तालुक्यातील जाखोरी व भगूर जवळील राहूरी गावाच्या शिवारात दारणा नदीच्या काठी लावलेल्या पिंज-यात बुधवारी (दि.५) पहाटेच्या सुमारास दोन बिबटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे, दारणा काठच्या गावांतील जेरबंद केलेल्या बिबट्यांची संख्या दहा झाली आहे.
राहुरी येथील संतोष सानप यांच्या मळ्याजवळ पेरुचा बागेत लावलेल्या पिंज-यात वनविभागाने लावलेल्या पिंज-यात बुधवारी(दि.५) पहाटे बिबट्या जेरबंद करण्यात आला आहे. पोलीस पाटील स्वाती पानसरे यांनी वनविभागाला बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती दिल्या परिमंडळ अधिकारी मधुकर गोसावी व त्यांच्या पथकाने बिबट्या असलेला पिंजरा ताब्यात घेऊन गंगापूर येथील रोपवाटीकेत ठेवण्यात आला आहे.
दरम्यान जाखोरी परिसरातील देवी मंदिराजवळ लावलेल्या पिंज-यांत बिबट्या जेरबंद करण्यात आल्याची माहिती विलास जगळे यांनी दिली, बिबट्याला पहाण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली होती, पोलीस पाटील जगळे यांनी वनविभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाचे पथक जाखोरीत दाखल झाले आहे.