घरमहाराष्ट्र'गंगाखेड साखरे'चे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांना अटक

‘गंगाखेड साखरे’चे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांना अटक

Subscribe

शेतकऱ्यांच्या नावे कर्ज उचलणाऱ्या गंगाखेड येथील प्रसिद्ध उद्योजक आणि 'गंगाखेड साखरे'चे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे.

परभरणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील प्रसिद्ध उद्योजक आणि ‘गंगाखेड साखरे’चे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. गुट्टे यांनी २२ बोगस कंपन्या स्थापन करुन त्या माध्यमातून २६ हजार शेतकऱ्यांना आणि बँकांना सुमारे ३०० कोटी रुपयांना फसवल्या प्रकरणी आज दुपारी रत्नाकर गुट्टे यांच्यासह त्यांचे लेखाधिकारी दत्तात्रय गायकवाड या दोघांना विशेष तपास पथकाने अटक केली आहे.

असा उघडकीस आला घोटाळा

रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेड शुगर्स कारखान्याने हार्वेस्ट अँण्ड ट्रान्सपोर्ट योजनेखाली २०१५ मध्ये ६०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचेया नावे कर्जे उचलली. यापोटी शेतकऱ्यांना मिळालेली वाहने या कारखान्याला कामावर लावून कारखान्याकडे सर्व हप्त्यांची परतफेड करुनही कारखान्याने रक्कम बँकांना परतफेड न केल्यामुळे ही रक्कम थकीत झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना २० ते २५ लाख रुपयांच्या वसुलीसाठी बँकांच्या नोटीस घरपोच गेल्या आणि हा घोटाळा उघडकीस आला आहे.

- Advertisement -

आदेश देऊनही कारवाई नाही

रत्नाकर गुट्टे हा महाराष्ट्रातील छोटा नीरव मोदी असल्याचा आरोप करत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी गुट्टेंवर कारवाई करण्याची मागणी विधीमंडळात केली होती. तसेच गुट्टे यांनी यापूर्वीही शेतकऱ्यांच्या नावे शेकडो कोटी रुपयांचे पीककर्ज उचलल्याची आणि ती कर्जे थकवल्याने बँकांनी शेतकऱ्यांकडे वसुलीचा तगादा लावल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यासंदर्भात न्यायालयाने आदेश देऊनही त्यावर कुठलीच कारवाई झाली नव्हती.

रत्नाकर गुट्टे यांच्यावर ५ जुलै २०१७ रोजी भादंवि कलम ४०६, ४०९, ४१७, ४२० आणि ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तब्बल २० महिन्यानंतर गुट्टे यांस अटक झाली. गुट्टे यांनी त्यांच्या विविध कंपन्यांवर शून्य उलाढाल असतानाही बनावट कागदपत्रे तयार करुन सुमारे ३ हजार ५०० ते ५ हजार ५०० कोटी रुपयांची कर्जे घेतली असल्याचे निदर्शनास आले आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -