लोकसभा निवडणूक, मतमोजणीचा गोंधळ, इव्हीएमच्या तक्रारी, आरोप-प्रत्यारोपांपासून राजकारण आता मोठ्या मनानं पराभवाचा स्वीकार आणि ऐतिहासिक विजयाचा तुफान जल्लोष इथपर्यंत येऊन पोहोचलं आहे. देशाचे पंतप्रधान कोण होणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. पण त्यानंतर आता खरी चर्चा सुरू झाली आहे ती मोदींच्या मंत्रिमंडळातल्या मंत्रिपदांची! महाराष्ट्रात शिवसेनेनं भाजपच्या बरोबरीनं १८ खासदार निवडून आले आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिमंडळात आपले मंत्री बसवण्यासाठी फिल्डींग सुरू झाली आहे. राज्यात युती झाली, तेव्हाच याविषयी चर्चा झाली असणार हे तर नक्की. मात्र, त्यांची संख्या किती असेल? आणि या १८ खासदारांपैकी कुणाची तिथे वर्णी लागेल? हा खरा चर्चेचा विषय आहे. शिवसेनेकडून ३ मंत्रिपदांची मागणी भाजपकडे करण्यात आली असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या अनुषंगाने ज्येष्ठ खासदार, तरूण नेतृत्व की मुंबईला मंत्रीपद याची उत्सुकता आता सगळ्यांना आहे.
भावना गवळी – यवतमाळ-वाशिम
शिवसेनेच्या १८ विजयी खासदारांच्या यादीतलं सर्वात ज्येष्ठ आणि मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार असलेलं नाव म्हणजे भावना गवळी. यवतमाळ-वाशिममधून १९९९च्या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा त्या खासदार म्हणून निवडून गेल्या. तेव्हापासून तिथून प्रत्येक लोकसभा निवडणुकीत त्याच जिंकून येत आहेत. यंदा पाचव्यांदा त्यांनी विजय मिळवला असल्यामुळे सर्वाधिक यशस्वी आणि विजयाच्या बाबतीत सर्वात ज्येष्ठ म्हणून त्यांचं नाव मंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे येऊ शकतं.
गजानन किर्तीकर – मुंबई उत्तर पश्चिम
२०१४मध्ये गजानन किर्तीकर पहिल्यांदा जरी खासदार झाले असले, तरी त्याआधी त्यांनी १९९०पासून विधानसभेतही आणि विधानसभा निवडणुकांमध्ये देखील आपलं राजकीय कौशल्य दाखवून दिलं आहे. महाराष्ट्र विधानसभेत ते ४ वेळा आमदार राहिले आहेत. तसेच वयाने देखील ते शिवसेनेचे सर्वात ज्येष्ठ खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या रुपाने मुंबईला केंद्रीय मंत्रीपद मिळू शकतं.
हेही वाचा – हातकणंगलेत का झाला राजू शेट्टींचा पराभव? वाचा ही कारणं!
विनायक राऊत – सिंधुदुर्ग-रत्नागिरी
शिवसेना आणि नारायण राणेंचं वैर तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण त्याच राणेंविरोधात गेल्या अनेक वर्षांपासून दंड थोपटून कोकणात उभ्या असलेल्या विनायक राऊत यांनी यंदा निलेश राणेंचा पराभव केला आहे. १९८५ सालापासून ते शिवसेनेचं प्रतिनिधित्व आधी मुंबई महानगर पालिकेत, नंतर विधानसभेत, विधानपरिषदेत आणि २०१४ साली लोकसभेत ते शिवसेनेचे खासदार म्हणून दाखल झाले. राज्यातल्या सर्वच सभागृहांमध्ये नेतृत्वाचा अनुभव असल्यामुळे त्यांचा मंत्रिपदासाठी विचार होऊ शकतो.
हेमंत गोडसे – नाशिक
यंदा शिवसेनेच्या निवडून आलेल्या खासदारांमध्ये तुलनेने हेमंत गोडसे तसा तरूण चेहरा आहे. मात्र, नाशिमध्ये यंदा त्यांनी इतिहास घडवला आहे. नाशिकमध्ये आजपर्यंत सलग दुसऱ्यांदा एकही खासदार निवडून आलेला नाही. यंदा मात्र हेमंत गोडसेंनी सलग दुसऱ्यांदा निवडून जाण्याची कमाल करून दाखवली आहे. तसेच, त्यांच्यावर आत्तापर्यंत कोणतेही आरोप किंवा गुन्हे देखील दाखल नाहीत. त्यामुळे एक तरूण आणि स्वच्छ चेहरा शिवसेना केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवण्याची शक्यता आहे.