मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील कृषी, महसूल, ग्रामविकास, आरोग्य, वने आणि इतर शासकीय विभागात तब्बल ७२ हजार पदांची मेगाभरती होईल, असे सुतोवाच केले होते. दोन टप्प्यांत ३६ हजार पदे भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली होती. त्यानंतर मात्र मराठा आरक्षणाचे भिजत घोंगडं राहिल्यामुळे ही भरती तात्पुरती थांबवली होती. मात्र आता मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी या भरती प्रक्रियेचा आढावा घेतल्यामुळे लवकरच भरती सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याबद्दलचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले असून लवकरच मेगाभरतीची जाहीरात प्रसिद्ध होईल, असेही या वृत्तात म्हटले आहे.
पहिल्या टप्प्यात ३६ हजार पदे भरली जाणार आहेत. यापैकी
ग्रामविकास विभागातील ११ हजार ५ पदे, सार्वजनिक आरोग्य विभागातील १० हजार ५६८ पदे, गृह विभागातील ७ हजार १११ पदे, कृषी विभागातील २ हजार ५७२ पदे, पशुसंवर्धन विभागातील १ हजार ४७ पदे, सार्वजनिक बांधकाम विभागातील ८३७ पदे, जलसंपदा विभागातील ८२७ पदे, जलसंधारण विभागातील ४२३ पदे, मत्स्यव्यवसाय विकास विभागातील ९० या पदांसह नगरविकास विभागातील १ हजार ६६४ पदांचा समावेश आहे.