राज्यात आदर्श ग्रामपंचायत आणि आदर्श सरपंच म्हणून ओळख असलेल्या पाटोद्या गावातील भास्करराव पेरे-पाटलांचं वर्चस्व संपूष्टात आलं आहे. राज्यात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. दरम्यान, औरंगाबादमधील पाटोदे गावाच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल लागला. निकाल धक्कादायक लागला असून तब्बल २५ वर्षांनी आदर्श गाव असलेल्या पाटोद्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. भास्कर पेरे-पाटील यांचं तब्बल पंचवीस वर्ष एक हाती गावावर वर्चस्व होतं. मात्र यावर्षी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यांच्या जागेवर त्यांची कन्या अनुराधा पेरे-पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. मात्र, त्यांच्या विरोधात उभे असेलेले दुर्गेश खोकड यांनी त्यांचा पराभव केला आहे.
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज लागत आहे. आदर्श गाव असलेल्या पाटोद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागले. यात भास्कर पेरे-पाटील यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. अकरा सदस्य असलेल्या पाटोदा ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीपूर्वीच आठ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित तीन जागांसाठी निवडणूक पार पडली. तीन जागांपैकी एका जागेवर भास्कर पेरे-पाटील यांच्या कन्या अनुराधा पेरे-पाटील उभ्या होत्या. त्यांचा पराभव त्यांच्याविरोधात उभ्या असलेल्या दुर्गेश खोकड यांनी पराभव केला. दुर्गेश खोकड यांना २०४ मतं मिळाली तर अनुराधा पेरे-पाटील यांना १८४ मतं मिळाली आहेत.
भास्कर पेरे-पाटलांचं वर्चस्व संपुष्टात
यावेळेची पाटोदा ग्रामपंचायत निवडणूक चांगलीच चर्चेत होती. कारण आदर्श सरपंच म्हणून ओळख असलेले भास्कर पेरे-पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. तसंच भास्कर पेरे-पाटील यांच्याविरोधात पॅनेल उभं करण्यात आलं होतं. निवडणुकीआधी ८ उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले होते. उर्वरित तीन जागांवर निवडणूक झाली. मात्र, या तिन्ही जागांवर भास्कर पेरे-पाटील यांच्या पॅनेलचा पराभव झाला. पाटोदा ग्रामपंचायतीच्या ११ जागांवर कपिंद्र पेरे-पाटील यांनी विजय मिळविला आहे.
हेही वाचा – Maharashtra Gram Panchayat: हिवरे बाजारामध्ये पोपटराव पवारांचं वर्चस्व; पुढच्या योजनांची केली घोषणा