हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल आज सोमवारी लागला आहे. ३० वर्षांनी हिवरे बाजार ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या निवडणुकीत पोपटराव पवार यांनी बाजी मारली आहे. पोपटराव पवार यांच्या पॅनेलने सर्व सातही जागा जिंकल्या आहेत. विजयानंतर पोपटराव पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पुढच्या योजनांची घोषणा देखील केली.
आदर्शगाव हिवरे बाजारमध्ये तब्बल ३० वर्षांनी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली. ज्या हातांनी गाव उभे केले, तेच हात यापुढेही गाव सांभाळण्यासाठी सक्षम आहेत, यावर ग्रामस्थांनी शिक्कामोर्तब केले आहे. पुढील पन्नास वर्षांच्या विकासाची पायाभरणी या निवडणुकीतून झाली आहे, अशी प्रतिक्रिया पोपटराव पवार यांनी विजयानंतर दिली. गेल्या ३० वर्षांच्या बिनविरोध निवडणुकांची परंपरा काही लोकांच्या हट्टामुळे खंडीत झाली असली तरी लोकांनी विश्वास दाखवत विजयी केलं. पोपटराव पवार यांनी पुढील योजनांची घोषणा देखील केली. “मोठ्या प्रमाणात उन्हाळी सिंचन वाढत आहे. म्हणून पुन्हा एकदा उन्हाळी सिंचनामध्ये फक्त जनावरांचा चारा, सिताफळ आणि जांभूळ हे वाढवून याचं ब्रँडिंग करायचं आहे. सिताफळ आणि दूध याचा मेळ बसला तर सिताफळ आयस्क्रिमचं उत्पादन करता येईल आणि संपूर्ण गावाला पुढची ५० वर्षांसाठी गावाच्या विकासासाठी महत्त्वाचं ठरणार आहे,” असं पोपटराव पवार म्हणाले.
दरम्यान, हिवरे बाजारात गेली ३० वर्षे बिनविरोध निवडणूक पार पडत होती. मात्र, यावेळी पवार यांच्यावर एकाधिकारशाहीचा आरोप करून गावातील काही विरोधकांनी बंड पुकारले. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीची पंरपरा मोडली गेली. मात्र, तरीही सयंमाने प्रचार करण्याचे ठरवून गावाने शांतता भंग होऊ दिला नाही. अखेर विरोधकांची डाळ शिजली नाही. पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे सर्व विजयी झाले. किशोर संबळे यांच्या परिवर्तन ग्रामविकास पॅनलचा धुव्वा उडाला.
हेही वाचा – Maharashtra Gram Panchayat: चंद्रकांत पाटलांच्या खानापूरमध्ये भाजपला धक्का; शिवसेनेने मारली बाजी