मराठा समाजाच्या मागण्यांसाठी एक झालेल्या मराठा समाजामधून स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र क्रांती सेना या नव्या राजकीय पक्षाने आगामी लोकसभा आणि विधासभा निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पाटील यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा केली आहे. पाडव्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्र क्रांती सेना या पक्षाची स्थापना करण्यात आली होती.
आगामी निवडणुका लढवणार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या दोन वर्षापासून राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सर्वच पक्षात राजकारण सुरु झाले आहेत. अशातच आता महाराष्ट्र क्रांती सेनेने आगामी लोकसभा निवडणुकीच्या सर्व म्हणजे ४८ आणि विधानसभा निवडणुकीच्या २८८ जागा लढवण्याची घोषणा केली आहे. कोल्हापूरामध्ये सुरेश पाटील यांनी ही घोषणा केली असून हा पक्ष निवडणुकीच्या तयारीला देखील लागला आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावर पक्षाची स्थापना
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी एक झालेल्या मराठा समाजामधून एका नव्या पक्षाची स्थापना केली गेली. दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर या पक्षाची स्थापना स्थापना करण्यात आली असून महाराष्ट्र क्रांती सेना असं या पक्षाचं नाव ठेवण्यात आले आहे. साताऱ्यात रायरेश्वराच्या मंदिरामध्ये या पक्षाची स्थापना करण्यात आली. मराठा समाजाचे सुरेश पाटील यांनी ही घोषणा केली होती. सप्टेंबर महिन्यातच मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पक्ष स्थापनेसंदर्भात मराठा समाजाचा मेळावा पार पडला होता. या मेळाव्यात ठरल्यानुसार पाडव्याच्या मुहूर्तावर हा पक्ष स्थापन करण्यात आला.