औरंगाबाद शहराच्या नामांतराचा हट्ट धरला तर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात येऊ शकते, असा इशारा काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम यांनी शनिवारी शिवसेनेला दिला. आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आहे, नामांतरासाठी नाही, असेही निरुपम म्हणाले. औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर औरंगाबादच्या नामांतराचा वाद पेटला आहे.
औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याची पुन्हा एकदा मागणी होत आहे. भाजपने शिवसेनेची कोंडी करण्यासाठी नामांतराचा मुद्दा लावून धरला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतर प्रकरणी पक्षाची भूमिका स्पष्ट केल्यानंतरही निरुपम यांनी शनिवारी ट्विट करत नामांतराच्या वादात उडी घेतली. औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. परंतु, राज्यातील सरकार हे तीन पक्षाचे आहे. आघाडीचे सरकार किमान समान कार्यक्रमासाठी आहे, कुणाचा वैयक्तिक अजेंडा राबविण्यासाठी नाही, असे निरुपम म्हणाले.
औरंगाबाद का नामांतरण शिवसेना का अपनी पुराना एजेंडा है।
लेकिन सरकार तीन पार्टियों की है, यह नहीं भूलना चाहिए।
गठबंधन की सरकारें कॉमन मिनिमम प्रोग्राम से चलती हैं।
किसी के पर्सनल एजेंडे से नहीं।
प्रोग्राम काम करने के लिए बना है,नाम बदलने के लिए नहीं।#Aurangabad— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 2, 2021
भाजपने औरंगाबादच्या नामांतरावरून शिवसेनेवर दुटप्पी राजकारणाचा आरोप लगावला आहे. नामांतराच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेची हातमिळवणी आहे. हे दोन्ही पक्ष जनतेच्या डोळ्यात धूळफेक करत आहेत, असा आरोप भाजपचे प्रवक्ते आणि आमदार राम कदम यांनी केला आहे.