नरभक्षक वाघिण अवनीची हत्या झाल्या प्रकरणी केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री मेनका गांधी फडणवीस सरकारवर चांगल्याच भडकल्या आहेत. त्यांनी ट्विटरवर या घटनेचा निषेध व्यक्त केला. वन्यजीवप्रेमी मेनका गांधी यांनी काल ट्विटवर सांगितले की, “अवनीची ज्याप्रकारे हत्या केली गेली त्यावरुन मला अतीव दुःख झाले आहे.” #Justice4TigressAvni हा हॅशटॅग वापरून मेनका गांधी यांनी दहा ट्विट करत फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
I am deeply saddened by the way tigress Avni has been brutally murdered in #Yavatmal, #Maharashtra. #Justice4TigressAvni https://t.co/hX6wuf62Ec
— Maneka Gandhi (@Manekagandhibjp) November 4, 2018
मुनगंटीवार वारंवार तीच चूक करतात
महाराष्ट्र सरकारवर आसूड ओढताना मेनका गांधी म्हणाल्या की, “महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यामध्ये अवनीची क्रूरपणे हत्या केल्यामुळे त्या अत्यंत दुःखी झाल्या आहेत. हा सरळ गुन्हेगारीचा मामला आहे आणि काही नाही. महाराष्ट्राचे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हत्येचा आदेश दिला. मुनगंटीवार वारंवार तीच चूक करत आहेत. त्यांच्या आदेशाने झालेली ही तिसरी वन्यप्राण्याची हत्या आहे. याआधी त्यांनी बिबट्या आणि जंगली अस्वलाला मारण्याचे आदेश दिले होते. प्रत्येक वेळी त्यांनी हैदराबादचे शिकारी शाफत अली खानचा वापर केला आणि या वेळी देखील अवनीला मारण्यासाठी त्यांनी शाफत अलीला पाचारण केले होते.”
वाघिणीला मारण्याचा कोणताही अधिकार नव्हता
महाराष्ट्र सरकारवर हल्ला करताना त्या असेही म्हणाल्या की “शाफत अली खानच्या मुलाला वाघिणीला मारण्याचा कोणताही अधिकार नव्हता. हे बेकायदेशीर आहे. वन अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम वाघिणीला शांत करून त्यानंतर बेशुद्ध करायला हवे होते. तरीही शिकाऱ्यांनी स्वतःच वन मंत्र्यांच्या आदेशाखाली वाघिणीला मारले. या भयानक खूनामुळे अवनीची दोन्ही पिल्ले मरण्याच्या उंबरठ्यावर आली आहेत.”