मराठा समाजाला न्याय द्या, ही आमची हात जोडून विनंती आहे. येत्या काळात जर न्याय मिळाला नाही तर केवळ सरकारविरोधातच नाही तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही मराठा समाज सोडणार नाही. त्यांच्याही घरी आम्ही मोर्चा काढू. बंगल्यावर आंदोलन करू. त्यांच्या काळातही मराठा आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे आता पेटून उठू, असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे.
मराठा समाज आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी रविवारी पुन्हा रस्त्यावर उतरला. मुंबईतील जांबोरी मैदानात मराठा क्रांती मोर्चाने रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास आंदोलन पुकारले. जांबोरी मैदान ते दहीसरपर्यंत मराठा संघर्ष यात्रा काढण्यात आली. या अभियानात शेकडो मराठा आंदोलक सहभागी झाले. आंदोलकांनी मराठा समाजाला आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.