घरमहाराष्ट्रबालमृत्यू रोखण्यासाठी ‘मेळघाट ॲक्शन प्लॅन’

बालमृत्यू रोखण्यासाठी ‘मेळघाट ॲक्शन प्लॅन’

Subscribe

'स्वाईन फ्लूवरील गोळ्या तसेच औषधांचा पुरेसा साठा राज्यात उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये', असे आवाहन रोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

‘मेळघाटमधील बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी महिला व बालविकास, आदिवासी विकास, अन्न व नागरी पुरवठा यासह अन्य विविध विभागांशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजनांचा मेळघाट ॲक्शन प्लॅन तातडीने तयार करावा’, असे निर्देश आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मेळघाटमधील बालमृत्यूचा आढावा घेण्यासंदर्भात मंत्रालयात आरोग्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी बैठक घेतली. अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा या तालुक्यात कुपोषणामुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढले आहे. ‘यासंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करून या भागातला बालमृत्यू दर शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत’, असे शिंदे यांनी सांगितले. ‘विविध कॉर्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक दायित्व निधीतून (सीएसआर) मेळघाटमध्ये आरोग्य सुविधांचे बळकटीकरण, त्याचबरोबर या भागात सेवा देणारे डॉक्टर्स, नर्स यांच्याकरिता उत्तम अशा पायाभूत सुविधांची उभारणी, आदिवासी बांधवांना रोजगार, वीज पुरवठा, मोबाईल संपर्क यंत्रणा उभारणे या सर्व बाबींचा समावेश असलेला एकत्रित असा ‘मेळघाट ॲक्शन प्लॅन’ त्वरित तयार करावा’, असे आदेश शिंदे यांनी दिले आहेत.

स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना 

आरोग्यमंत्री यावेळी म्हणाले की, ‘वातावरणातील बदलामुळे राज्यात काही ठिकाणी स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव जाणवत आहे. त्यामुळे स्वाईन फ्लू प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यासाठी विभागाने पाच कलमी कार्यक्रम राबवावा, असे निर्देश श्री. शिंदे यांनी दिले. स्वाईन फ्लूबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात आतापर्यंत एक लाख ७७ हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १७६४ संशयित रुग्णांना ऑसेलटॅमिवीर गोळ्या देण्यात आल्या असून, बाधित रुग्णांची संख्या ६६ एवढी आहे. सध्या राज्यात सर्वत्रच मोठ्या प्रमाणावर थंडी जाणवत आहे. एरवी राज्यात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत आणि फेब्रुवारी व मार्च या काळात रुग्ण आढळून येतात. यावर्षी मात्र जानेवारी महिन्यामध्ये हवामान बदलाचा परिणाम म्हणून स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून येत आहेत.’

- Advertisement -

‘इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएएम) मदतीने खासगी डॉक्टरांची कार्यशाळा जिल्हास्तरावर आयोजित करावी. तसंच महापालिका क्षेत्रामध्ये आयुक्तांनी जनजागृतीच्या उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात’, अशा सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. ‘स्वाईन फ्लूवरील गोळ्या तसेच औषधांचा पुरेसा साठा राज्यात उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये’, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -