बाप्पा गणपती गजानना राम मंदिर होऊ दे रे! असं साकडं सरसंघचालक मोहन भागवत यांनी गणपती चरणी घातलं आहे. अयोध्येत राममंदिर व्हावं यासाठी मोहन भागवत यांनी आज ( मंगळवारी ) पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं घातलं. शिवाय, अभिषेक देखील घातला. यावेळी गुरूजींच्या सुचनेनुसार त्यांनी संस्कृतमध्ये काही मंत्र देखील म्हटले. मागील काही दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा गाजतोय. नागपूरमध्ये दसऱ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी कायदा करावा अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी आता गणपती चरणी धाव घेत राम मंदिरासाठी साकडं घातलं आहे. शिवसेना देखील सध्या राममंदिराच्या मुद्यावर आक्रमक झालेली पाहायाला मिळत आहे. २०१४ साली भाजपनं अयोध्येमध्ये राम मंदिराची उभारणी करू असं वचन दिलं होतं. त्यावरून आता हिंदुत्ववादी संघटनांनी भाजपला जाब विचारायला सुरूवात केली आहे.
वाचा – राम मंदिर बांधण्यासाठी सुप्रीम कोर्टाला हे करावे लागणार
राम मंदिराचा मुद्दा तापणार
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरे देखील सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी राम मंदिराच्या मुद्यावरून भाजपला लक्ष केले. राम मंदिर बांधता येत नसेल तर तो मुद्दा देखील एक चुनावी जुमला होता हे मान्य करा अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. दरम्यान, याच मुद्यावरून उद्धव ठाकरे आता अयोध्येला देखील जाणार आहेत. शिवाय, यापूर्वी देखील त्यांनी चलो अयोध्या, चलो वाराणसी ही घोषणा दिली आहे. त्यामुळे भाजपची डोकेदुखी देखील वाढली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राम मंदिराचा मुद्दा गाजणार आहे.