घरमहाराष्ट्रविठ्ठलाचे फक्त मुखदर्शन, शिर्डीत ऑनलाईन पास

विठ्ठलाचे फक्त मुखदर्शन, शिर्डीत ऑनलाईन पास

Subscribe

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी न करण्याचे मंदिर व्यवस्थापनांचे आवाहन

कोरोना संसर्गजन्य रोगामुळे मागील ८ महिन्यांपासून बंद असलेले विठ्ठल रुक्मिणी मंदिर पाडव्यानिमित सुरू होणार आहे. मात्र, विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शना ऐवजी मुखदर्शन सुरू करण्यात येणार असल्याचे मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

कोरोना व्हायरसचा प्रतिबंधक उपाय म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांच्या हातावर सॅनिटायझर टाकण्यात येणार आहे. तसेच मंदिर सुरू करण्यापूर्वी मंदिरात स्वच्छता करण्यात येत आहे. भाविक सुरक्षित अंतरामध्ये थांबावेत यासाठी गोल आकरण्यात येणार आहेत. त्याचबरोबर भाविक एकमेकांच्या संपर्कात येऊ नये, यासाठी भाविकांना सुरक्षित वेळेने दर्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचबरोबर अधिक उपाययोजना करण्यासाठी मंदिर समितीची बैठक होणार असल्याचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी सांगितले.

- Advertisement -

मुंबई: राज्यातील सर्व मंदिरे सुरू करण्याचे आदेश ‘ही श्रींची इच्छा’ म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिराकडून भाविकांसाठी एक मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. तसेच ज्यांच्याकडे मोबाईल नाही त्यांच्यासाठी एक खिडकी योजनेची सोयही करण्यात आली असल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.

मोबाईल अ‍ॅपवरील क्यूआर कोड दाखवून भाविकांना दर्शन देण्याचा निर्णय सिद्धिविनायक मंदिराकडून घेण्यात आला आहे. शरिराचं तापमान मोजून आणि मास्क घातला असेल तरच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. प्रतितास 100 या प्रमाणे क्यूआर कोड तपासून भाविकांना दर्शनाची परवानगी देण्यात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना या अ‍ॅपवरुन 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. मात्र, पुढे परिस्थिती पाहून ज्येष्ठ नागरिकांसाठी निर्णय घेतला जाणार आहे. दिवसाला 1 हजार नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. दुपारी 12 ते 1 आणि संध्याकाळी 7 ते 8 या वेळेत मंदिर भाविकांसाठी बंद असणार आहे. भाविकांनी दिलेले नियम पाळून, सर्व काळजी घेत दर्शन घेण्याचे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने क्यूआर कोडनुसार दर्शन घेतले तरच परवानगी देण्यात येईल, असेही मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

तुळजाभवानी मंदिरात रोज 4 हजार भाविकांना दर्शन

तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भक्तांना ऑनलाईन बुकींग करावी लागणार असुन दररोज 4 हजार भक्तांना दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर संस्थानने केली आहे. त्यात 1 हजार पेड दर्शन पास तर 3 हजार मोफत दर्शन पास उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली. ऑनलाईन पास सोबतच ऑफलाईन पास सुद्धा भाविकांना मंदिर परिसरात काढता येणार आहेत.

शिर्डीत ऑनलाईन पास काढून दर्शन

राज्य सरकारने येत्या पाडव्यापासून प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतला. मंदिरे उघडण्यासाठी फारच कमी वेळ मिळाल्याने राज्यभरातील मोठ्या मंदिर व्यवस्थापनांची धावपळ होणार आहे. पाडव्याच्या दिवशी प्राधान्याने ग्रामस्थांना टप्याटप्प्याने दर्शन देण्यात येईल. शिर्डी बाहेरील भाविकांनी ऑनलाईन पद्धतीने पास काढूनच दर्शनासाठी यावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी एकाच वेळी दर्शनासाठी गर्दी करू नये असे आवाहन संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी केले.

कोरोनामुळे गेल्या १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता साईमंदिर बंद करण्यात आले होते. तब्बल २४२ दिवसांनी पाडव्याला साईमंदिर उघडणार आहे. सुरुवातीला सहा हजार भाविकांना ऑनलाईन पद्धतीने रोज दर्शन घेता येईल. हळूहळू ही संख्या वाढवण्यात येईल. ६५ वर्षांवरील वृद्धांना दर्शनाची अनुमती नसेल. दर्शन रांगेत सॅनिटायझेशन, थर्मल स्क्रिनिंग व पाय धुण्याची व्यवस्था असेल. भाविकाला ताप असेल तर त्यास तत्काळ संस्थान रुग्णालयात दाखल करण्यात येईल. भाविक कोरोनाबाधित आढळला तर त्याला संस्थानच्या कोविड उपचार केंद्रात दाखल करण्यात येईल. रोज दर्शन घेणार्‍या भाविकांमधून किमान पन्नास भाविकांना आठवडाभराने फोन करून तब्येतीविषयी त्यांच्याकडून फिडबॅक घेतला जाणार आहे.

भाविकांना समाधी व द्वारकामाई मंदिरात जाऊन दर्शन घेता येईल. मात्र, चावडी आणि मारूती मंदिरात बाहेरूनच दर्शन घ्यावे लागेल. समाधी दर्शनानंतर बॅरिकेडिंगमधून पाच नंबर गेटने भाविकांना बाहेर पाठवले जाईल. भाविकांना मंदिरात हार, प्रसाद आदी पूजा साहित्य नेता येणार नाही. सत्यनारायण, अभिषेक पूजा, ध्यानमंदिर, पारायण कक्ष बंद ठेवण्यात येणार आहे. भाविकांना केवळ उदी देण्यात येईल, बुंदी प्रसाद किंवा दर्शन रांगेतील कॅन्टीनमध्ये चहा-बिस्किटे मिळणार नाहीत. कोरोनाचा संसर्ग कमी होताच हळूहळू भाविकांना पूर्वीप्रमाणे दर्शन व अन्य सुविधा मिळतील. प्रसादालय व भक्तनिवास सुरू करण्यात येणार आहे.भक्तनिवासात रोज एकाआड एक रूम देण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचे साईनगरीत फटाके फोडून व मिठाई वाटून स्वागत करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -