देशात कोरोनाचे संकट असताना राज्यामध्ये सरकारने अनलॉक प्रक्रियेत ज्येष्ठ कलाकारांना मात्र फिरण्यावर निर्बंध कायम ठेवण्यात आले होते. परंतू मुंबई हायकोर्टाने ज्येष्ठ कलाकारांच्या फिरण्यावरील निर्बंध हटवले असून सरकारला दणका दिलेला आहे. त्यामुळे आता टीव्ही मालिका आणि चित्रपटांच्या शूटींगकरता ज्येष्ठ कलाकार जाऊ शकणार आहेत. गेल्या महिन्यांपासून राज्यात टीव्ही तसेच चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे. मात्र राज्य सरकारच्या नियमावलीनुसार ६५ वर्षांवरील कलाकारांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयाला अनेक ज्येष्ठ कलाकारांनी नाराजी दर्शवली होती. रोहिणी हट्टगडी, दिलीप प्रभावळकर, उषा नाडकर्णी यांनी आम्हालाही शूटींगला जाण्याची परवानगी मिळायला हवी. आम्ही खबरदारीच्या सर्व उपाययोजना करू, असे म्हटले होते. त्यामुळे आता मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानंतर या ज्येष्ठ कलाकारांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.
Bombay High Court allows all persons above 65 years of age working in the entertainment industry to work on a film set. The court sets aside the state government order.
— ANI (@ANI) August 7, 2020
ज्येष्ठ कलाकारांना निर्बंध घालणारी सरकारची दोन्ही पत्रके बेकायदा ठरवून रद्द केली आहेत. ‘मिशन बिगीन अगेन’ सुरू करताना राज्य सरकारने लॉकडाउनमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय मे महिन्याच्या अखेरीस घेतला. त्यात टीव्ही मालिका तसेच चित्रपटाच्या चित्रिकरणासाठीही सशर्त परवानगी देण्यात आली. मात्र, ६५ किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या कलाकारांना चित्रिकरणात सहभागी होता येणार नसल्याचे परिपत्रकात स्पष्ट केले होते. त्यामुळे अनेक ज्येष्ठ कलाकार अडचणीत आले. विविध टीव्ही मालिकांत काम करणारे अभिनेते प्रमोद पांडे यांनी अॅड. अशोक सरोगी यांच्यामार्फत याप्रश्नी कोर्टात याचिका करण्यात आली होती. तर ‘इंडियन मोशन पिक्चर्स प्रोड्युसर्स असोसिएशन’नेही याचिका केली होती. याविषयीच्या अंतिम सुनावणीनंतर न्या. शाहरुख काथावाला यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने आपला निर्णय २९ जुलै रोजी राखून ठेवला होता. तो खंडपीठाने आज जाहीर केला.
हेही वाचा –
Coronavirus: देशात बाधितांचा आकडा २० लाखांपार! २४ तासात ६२,५३८ नवे रूग्ण