देशभरात कोरोनाचं वाढतं संकट समोर असताना दुसरीकडे घरगुती हिसांचाराच्या घटनांमध्ये देखील वाढ होत आहे. अशा परिस्थितीत जालन्यातून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. एका ३ महिन्याच्या चिमुकल्याला घरासमोर असणाऱ्या पाण्याच्या टाकीत टाकून जीवे मारल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी अंबड शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
असा घडला प्रकार
जालन्यातील आंबेडकर नगर भागात राहणाऱ्या पायल विजय जाधव या महिलेने तिच्या ३ महिन्याच्या मुलास रात्री एक वाजता दूध पाजले, त्यानंतर तिने घरातील पलंगाला असलेल्या झोळीत बाळाला झोपी घातले. त्यानंतर महिला आणि तिचा पती विजय जाधव दोघे घराबाहेर झोपले होते. दरम्यान, सदर चिमुकला सकाळी घरासमोरील पाण्याच्या टाकीत मृतावस्थेत सापडला.
दरम्यान अज्ञात आरोपीने झोळीतील चिमुकल्यास पाण्याच्या टाकीत टाकून त्याचा खून केला, असा संशय पोलीस व्यक्त करत आहेत. याप्रकरणी अंबड पोलिसात अज्ञात आरोपी विरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अद्याप या बाळाचा जीव कोणी घेतला हे समोर आले नसून सध्या पोलीस तपास करत आहेत.