नारायण राणे यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र केल्यानंतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापन केली. त्यानंतर त्यांनी एनडीएला पाठिंबा देत राज्यसभेची खासदारकी मिळवली. मात्र शिवसेनेला युतीत घेतल्यास आम्ही एनडीएचा पाठिंबा काढून घेऊ असा ‘स्वाभिमान’ही दाखवला होता. युतीचे काय होणार हे अजून गुलदस्त्यात असले तरी भाजपने मात्र आपल्या जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणे यांना स्थान दिले आहे. २०१४ नंतर काँग्रेसमध्ये असताना राणे यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली होती. आता त्या धोरणांबाबत जाहीरनामा समितीमध्ये ते काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आगामी लोकसभेचे पडघम वाजू लागताच भाजपने लोकसभेची तयारी सुरु केली आहे. जाहीरनामा बनवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वीस सदस्यांची समिती तयार केली आहे. त्यामध्ये स्वाभिमान पक्षाचे संस्थापक राणे यांना स्थान देण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून भाजपवर नाराज असलेले नारायण राणे यांचे भाजपविरोधातील बंड यानिमित्ताने थंड होणार का? हा देखील एक प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेला येत आहे.
जाहीरनामा समितीसोबतच लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी देखील समिती गठित करण्यात आली आहे. आठ सदस्यांची ही समिती असून त्यामध्ये अरुण जेटली, पीयूष गोयल, राज्यवर्धन राठोड यासारख्या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. तर इतर सामाजिक संघटनांना आपल्याकडे वळवण्यासाठी सामाजिक संस्था संपर्क समिती तयार केली आहे. नितीन गडकरी यांच्यासमवेत या समितीमध्ये १३ सदस्य आहेत.