द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील शेतकर्यांना परराज्यातील व्यापार्यांनी तब्बल साडेदहा कोटींना गंडा घातल्याची माहिती उघडकीस आली आहे. कारसूळचे माजी उपसरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र काजळे यांनी माहितीच्या आधिरातून ही माहिती मिळवली. विशेष म्हणजे ज्या शेतकर्यांनी पोलीस ठाण्यात व्यापार्याविरुध्द फिर्याद दाखल केली त्यांच्याविषयीच ही माहिती आहे. ज्यांनी फिर्याद दिलेली नाही, अशा अनेक शेतकर्यांचीही फसवणूक झाल्याचा अंदाज देवेंद्र काजळे यांनी वर्तवला आहे.
निफाड तालुक्यातील शेतकरी नवनवीन वाण विकासित करुन द्राक्षाचे उत्पादन घेतो. नैसर्गिक आपत्ती असेल किंवा निर्यातच्या अडचणी यावर प्रभाविपणे मात करत येथील शेतकरी प्रत्येकवर्षी कोट्यावधी रुपयांचे द्राक्ष निर्यात करतो. तसेच स्थानिक असेल किंवा परप्रांतिय व्यापारी यांना द्राक्ष विकतो. केवळ विश्वासापोटी हे द्राक्ष देण्याचे काम शेतकरी प्रत्येक वर्षी करतो. द्राक्ष खरेदी करुन घेतल्यानंतर शेतकर्यांना पैसे न देताच व्यापारी पोबारा झाल्याचे प्रकार अलिकडे उघडकीस आले आहेत. गेल्या दहा वर्षात व्यापार्यांनी तब्बल 10 कोटी 50 लाख 68 हजार रुपयांचा गंडा या शेतकर्यांना घातला आहे. अशा बुडव्यांना लगाम घालण्यासाठी 2017 मध्ये कायदा करण्याचे ठरले होते. परंतु, हा कायदाही अजून अस्तित्वात आलेला नाही. जे व्यापारी नाशिक जिल्ह्यात द्राक्ष खरेदीसाठी येतील त्यांना शासकीय परवाने किंवा कायदा विधायक होण्यासाठी मुख्यमंत्री, कृषीमंत्री, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी या सर्वांना स्वातंत्र निवेदनही काजळे यांनी दिले होते. याविषयावर सर्वांगाने चर्चा होऊनही कायदा करण्यात आलेला नाही. त्या अनुषंगाने देवेंद्र काजळे यांनी 2009 ते 2019 या कार्यकाळात व्यापार्यांविरोधात किती खटले दाखल झाले आहेत, याची माहितीची विचारणा केली होती. त्यातून साडेदहा कोटींचा आकडा उघडकीस आला आहे.
व्यापार्यांवर कारवाई होईल का?
नाशिकचे नवनियुक्त विशेष पोलीस महासंचालक प्रताप दिघावकर यांनी पहिल्याच दिवशी शेतकर्यांची आर्थिक फसवणूक खपवून घेणार नसल्याचे सांगत व्यापार्यांना इशारा दिला होता. विशेष म्हणजे शेतकर्यांसाठी त्यांनी स्वत:चा मोबाईल (9773149999) क्रमांक देत तक्रार करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी केलेल्या अहवानानुसार शेतकरी तक्रारही करणार असून या व्यापार्यांवर कारवाई होईल का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
अनेक द्राक्ष उत्पादक शेतकर्यांची द्राक्षबागा कधी अवकळीने नुकसान होते तर कधी परप्रांतीय व्यापार्याकडुन यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने अवकळी बाबत कायद्यात बदल कराव तर व्यापार्यासाठी कायदा लागु करावा.
-देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते (कारसूळ, ता.निफाड)