पाच दिवसांपासून पायी निघालेल्या बिर्हाड मोर्चेकऱ्यांनी शनिवारी नाशिकमध्ये दाखल होत आदिवासी विभागाच्या वतीने घेतली जाणारी परीक्षा उधळून लावली. दरम्यान, शहराच्या मध्यवर्ती भागाकडे कूच केलेल्या मोर्चकऱ्यांसमवेत वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांनी शिष्टमंडळाशी रविवारी (१७ फेब्रुवारी) चर्चेची तयारी दर्शविल्याचे सांगण्यात आले.
आदिवासी शाळांमध्ये तुटपुंज्या मानधनावर काम करणार्या सर्व जाती, धर्माच्या शिक्षकांना अगोदर न्याय द्यावा, या मागणीसाठी संपूर्ण राज्यातून अडीच हजार महिला, पुरुष शिक्षकांनी सोमवारपासून पायी बिर्हाड मोर्चा काढला आहे. मोर्चातील शीतल बामणे, संतोष कापुरे, गणेश गिरासे, किरण पाडवी, पंकज वसावे यांची प्रकृती बिघडली आहे. दरम्यान, आदिवासी शाळांमध्ये वर्षानुवर्षे रोजंदारीवर काम करणार्या अडीच हजार शिक्षकांनी सोमवारी ११ फेब्रुवारीस मुंबई-आग्रा महामार्गावरील सोग्रस फाटा येथून पायी बिर्हाड मोर्चाला सुरुवात केली आहे. मजल-दरमजल करत हा मोर्चा शुक्रवारी नाशिकमध्ये पोहोचला. मोर्चाच्या समन्वयकांनी शहरातील लॉन्सधारकांशी संपर्क साधत महिलांच्या निवासाची व्यवस्था करण्याची विनंती केली. त्यानंतर जत्रा हॉटेल शेजारील पंचकृष्ण लॉन्समध्ये मोर्चेकर्यांनी मुक्काम केला. सकाळी नाशिक शहराकडे कूच केलेल्या मोर्चाने अशोका मार्गावरील केंद्रात नियोजित परीक्षा उधळून लावली. त्यानंतर दुपारी २ वाजेदरम्यान पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा सुरू केली. ही चर्चा यशस्वी झाल्यास वाहतूक कोंडीसह आदिवासी विभागाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षेवरील संकटही टळू शकणार आहे. अन्यथा, हा मोर्चा पुढे जाईल आणि त्यातून सर्वसामान्यांसोबतच पोलिसांनाही मनस्ताप होईल.
आंदोलकांवर पोलिसांचे विशेष लक्ष
आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिसांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. पायी प्रवासात बिर्हाड आंदोलकांनी ठिकठिकाणी रास्ता रोको करत वाहतूकीस अडथळा निर्माण केला. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो, याचा अंदाज घेत पोलीस आयुक्तांनी शुक्रवारी १५ फेब्रुवारीस घेऊन पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. मोर्चासाठी विशेष फौज तैनात केली जाणार आहे.