कोकण पर्यटन विकास संस्थेच्या वतीने आयोजित आंबा महोत्सवाला नाशिककरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. गेल्या २० दिवसात नाशिककरांनी सुमारे ३ कोटींंचे आंबे खरेदी केले. यात कोकणचा राजा अर्थात हापूस आंब्यास सर्वाधिक पसंती देण्यात आली. त्यानंतर पायरी आंबा खरेदी करण्यासाठी शहरवासियांनी कल दर्शविला.
नाशिकचे ग्रामदैवत कालिका देवी मंदिराच्या सभागृहात ३० एप्रिलपासून आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात रत्नागीरी जिल्ह्यातील दापोली, केळशी, अंजर्ला, गणपतीपुळे, संगमेश्वर बिरजोळे, मांजरे, पावस, लाजा, राजापूर, सिंधूदुर्ग जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, कुडाळ, देवगड, विजय दुर्ग, जामसंडे आदी भागातील आंबा उत्पादक शेतकर्यांनी सहगाभ घेतला होता. शेतकर्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्याने दोघा घटकांच्या दृष्टीने आर्थिक फायदा करुन देणारा हा महोत्सव ठरला. याशिवाय कोकणातील आंबा, फणस, काजू, करवंद, जांभूळ, आवळा यापासून बनवलेला विविध प्रकारचा कोकणमेवा महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध होता. हा मेवा देखील हातोहात खपला.
अक्षय तृतीयेला सर्वाधिक विक्री
अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर आंब्याची सर्वाधिक विक्री झाली. अक्षय तृतीयेला दुपारी ३ वाजेपर्यंत जवळपास सर्वच विक्रेत्यांकडील तयार आंबे विकले गेले होते.
उलाढाल तीन कोटींवर पोहोचली
गेल्या चौदा वर्षांपासून आम्ही हा महोत्सव भरवतो. पहिल्या वर्षी ५० लाखांपर्यंत उलाढाल होती. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी ती दीड कोटींपर्यंत पोहचली. गेल्यावर्षी सुमारे दोन कोटींपर्यंत उलाढाल झाली होती. यंदा ती थेट तीन कोटींवर जाऊन पोहोचली. – दत्ता भालेराव, अध्यक्ष, कोकण विकास पर्यटन विकास
अनावश्यकरित्या खर्च वाचला
अवकाळी पाऊस आणि गारपीटीने आंब्याचे प्रमाण यंदा कमी होते. परंतु नाशिककरांचे समाधान होईल इतके आंबे आम्ही महोत्सवात आणू शकलो. शेतकरी आणि ग्राहक असा थेट व्यवहार होत असल्याने दलालांवर अनावश्यकरित्या होणारा खर्च वाचला. त्यातून आम्हाला दोन पैसेही कमवता आले. – किरण कुल्ये, मांजरे, जिल्हा रत्नागिरी