जिल्हा करोनाच्या संकटातून सावरत आहे. जनजीवनदेखील हळूहळू पूर्वपदावर येत आहे. हे संकट संपुर्ण देशासाठी नवीनच होते. राज्यात देखील रूग्णसंख्या वाढली परंतु आता सर्व परिस्थिती नियंत्रणात येत आहे. शासनाने वेळोवेळी लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केल्याने उद्योग, कारखाने, दुकाने सुरू करण्यात आली आहेत. दुकानांची वेळ वाढविण्याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले, जिल्हयाची लोकसंख्या ६२ लाख आहे यात नाशिक शहर २० लाख मालेगांव शहराची लोकसंख्या १० लाख आहे. इतक्या मोठया लोकसंख्येच्या जिल्हयात करोनाच्या आजारामुळे ३ रूग्ण व्हेटींलेटरवर आहेत यावरून जिल्हयातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे सौम्य लक्षणे असलेली १६ रूग्ण आहेत. ३८० करोनाबाधित रूग्ण हे रूग्णालयांत उपचार घेत आहेत. मात्र उगाचच मोठे आकडे दाखवल्यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण होते. लॉकडाउन शिथील केल्याने एकाचवेळी मोठया प्रमाणावर नागरिक घराबाहेर पडत असल्याने रूग्णसंख्या वाढण्याचा धोका नाकारता येत नाही परंतु सुरूवातीला जी परिस्थिती निर्माण झाली होती ती सर्वांसाठीच नवीन होती आणि अनुभवातुन आपण या परिस्थितीवर मात केली आहे. वेळोवेळी केलेल्या उपाययोजनांमुळे आता नाशिक शहर आणि जिल्हयात परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगधंदे सुरू झाले आहेत. या उद्योगांमध्ये कामगारही कामावर परतले आहेत. मालेगांवमध्ये सुरूवातीला उद्योग सुरू करण्यात काही अडचणी होत्या परंतु आता मालेगावमधील यंत्रमाग सुरू करण्यात आले आहे. आता बाजारपेठांमधील सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु दुकानांसाठी वेळेचे निर्बंध आहेत. मात्र आता दुकानांची वेळ वाढवण्याबाबत आम्ही विचार करत असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या बैठकीत खरिप हंगामाबाबत आढावा घेण्यात आला. पीककर्ज वाटप, बियाणांची उपलब्धता व पुरवठयाबाबत नियोजन, खतांची उपलब्धता व पुरवठा याबाबत नियोजन, सिंचनासाठी पाणी आरक्षणाचे नियोजन याचा यावेळी आढावा घेण्यात आला. या बैठकीप्रसंगी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे आदि उपस्थित होते.
नुकसान भरपाईसाठी पॅकेज
निसर्ग चक्रीवादळामुळे नाशिक जिल्हयात १९१ हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचे नुकसान झाले. २१ शेडनेट, कांदाचाळी, पॉली हाउसचेही नुकसान झाले. पोल्ट्री व्यावसायिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेकांनी शेती तसेच शेतीपुरक उद्योगांसाठी कर्ज काढले होते. मात्र आता वादळाने या शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून एकूणच नुकसानीचा सर्व आढावा घेउन याबाबत शासन लकवरच पॅकेज जाहीर करेल असे भुजबळ म्हणाले.