सुशांत किर्वे
एखादा व्यक्ती किंवा प्राणी विषामुळे बेशुद्धावस्थेत जातो. त्यानंतर संबंधितावर रूग्णालयात उपाचार केले जातात. विषाच्या तीव्रतेमुळे संबंधित व्यक्ती किंवा प्राण्याचा मृत्यू झाल्यानंतर शवविच्छेदन केले जाते. विषप्रयोगानंतर १५ दिवसांनी मृत्यू झाल्यावर डॉक्टरांनाही शवविच्छेदनातून अचूक निदान करता येत नाही. त्यानंतर शवविच्छेदन व्हिसेरा राखून ठेवत फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठविला जातो. विषशास्त्र विभागाकडून अद्यावत तंत्रज्ञान, मशीन व तज्ज्ञांकडून मृत्यूचे अचूक निदान कोणत्या विषामुळे झाले ते केले जाते. त्यामुळे मृत्यूच्या कारणाची उकल करण्यात पोलिसांना यश येत आहे.
सीआरपीसी २९३ नुसार न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल न्यायालयात ग्राह्य धरला जात आहे. प्रयोगशाळेत प्रकरणे दाखल झाल्यानंतर एक महिन्याच्या आत अहवाल दिला जातो. विषशास्त्र विभागात तपासणीसाठी आलेल्या प्रकरणांवरून विषामुळेच मृत्यू झाला आहे का, हे कारण शोधले जाते.. त्याचबरोबर विषप्रयोगातून एखाद्या व्यक्तीचा दगाफटका झाला आहे का, हे निष्पन्न करण्यासाठी त्याला पूरक ठरणारे पुरावे पोलिसांमार्फत घटनास्थळी शोधले जातात. त्याआधारे तपासाची सूत्रे फिरवत घटनेचा उलगडा केला जातो.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि अनुभवी तज्ज्ञांमुळे वेळेची बचत
दिंडोरी येथील न्यायववैद्यक प्रयोगशाळेतील विषशास्त्र विभागात जीसीएमएस व जीसीएचएस या अद्यावत यंत्रणा आहेत. विषशास्त्र विभागाकडे दर महिन्यात सरासरी २०० प्रकरणे दाखल होतात. आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि अनुभवी तज्ज्ञांमुळे प्रकरणाची उकल कमी वेळेत होत आहे. – भाऊसाहेब मोरे, उपसंचालक, प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा
२०१८ मध्ये उकल केलेली प्रकरणे
- प्राणी विषबाधा – ४७
- रस्ते अपघात – ६१
- खून – १२८