चेन्नई ते कारशेड असा प्रवास करून आलेल्या कल्याण-नाशिक १२ डब्यांच्या लोकलच्या कसारा घाटातील प्रलंबित चाचणीसाठी आरडीएसओकडून ग्रीन सिग्नल मिळाला असून, यासाठी रेल्वेने संबंधीत विभागाकडे ९ लाख रुपये वर्ग केले आहेत. चाचणी घेताना रिस्क नको म्हणून रेल्वेने खडी टाकून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, परंतू कल्याणला खडी भरायला ट्रॅक उपलब्ध होत नसल्याने पुन्हा अडथळा येत आहे.
कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेल्या कल्याण-नाशिक लोकल चाचणीसाठी रेल्वे प्रशासनाने नऊ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याने आता लोकलची नाशिककडे धाव निश्चित झाल्याची चिन्हे आहेत. लोकल चाचणी विनाप्रवाशी घेण्याच्या सूचनेमुळे रेल्वे प्रशासनाने आता खडीच्या गोण्या भरून चाचणी करणार असल्याचे सांगितले. बारा डब्याच्या लोकलचे मशिन स्वयंचलित व अतिउच्च शक्तीच्या मोटारींसह सज्ज असून इतके वजन घेऊन घाटातून सहजपणे चढ उतार करणार असल्याचा आत्मविश्वास तांत्रिक विभागाने बोलून दाखविला आहे. यामुळे चाचणी यशस्वी झाली तर नाशिक हे लोकलने मुंबईला जोडले जाईल, जो नाशिककरांसाठी सुवर्णक्षण ठरेल.
सध्या कुर्ला कारशेडमध्ये सर्व्हिसिंगचे काम सुरू असून, चाचणीसाठी प्रशासनाने खडी व त्यासाठी लागणार्या गोण्यांची व्यवस्था केली आहे. प्रत्येक डब्यात माणसांच्या संख्येच्या तुलनेत खडीने भरलेल्या गोण्या ठेवण्यात येणार आहेत. त्यांचे वजन साधारण ५० ते ७० किलो ठेवण्यात येणार आहे. यामुळे पूर्व सावधानता म्हणून रेल्वेने खडी टाकून चाचणी घेण्याचे पाऊल उचलले आहे. परंतू कल्याण रेल्वे स्थानकावर या नव्या लोकलला चाचणीसाठी खडी भरण्यास एकही ट्रॅक मिळत नाही ही आश्चर्याची बाब आहे. लोकलची चाचणी प्रशासकीय अडथळ्यात गुरफटत असून वारंवार अडचणी येत असल्याने नाराजी आहे.