मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणारी उपनगरीय लोकल गाडी रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे सुमारे 15 मिनिटांपेक्षा अधिक उशिराने कसारा स्थानकात पोहचत असते. या गाडीला होणारा उशीर ही नित्याचीच बाब झाल्यामुळे प्रवासी वैतागले आहेत. रेल्वे प्रशासनाने जारी केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज स्थानकातून दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी सुटणारी 96409 क्रमांकाची कसारा लोकल 6 वाजून 3 मिनिटांनी कसारा स्थानकात येणे अपेक्षित असते. पण ही लोकल गेल्या वर्षभरापासून नेहमीच अर्ध्या तासापेक्षा जास्त उशिराने पोहचत आहे. यामुळे या लोकलने प्रवास करणारे प्रवासी अक्षरश: रेल्वे प्रशासनाच्या कारभाराला वैतागले आहेत.
मुंबई शहर व उपनगरात पोहचण्यासाठी संध्याकाळी साडेपाच पासूनच प्रवाशांची कसारा स्थानकात गर्दी असते. या मार्गावरून पुढे खर्डी, आटगाव या स्थानकातील प्रवाशांना पुढील प्रवास करण्यासाठी कसाराहून सुटणार्या या लोकल शिवाय इतर पर्याय नसतो. या लोकलची सुटण्याची वेळ संध्याकाळी 6.18 वाजता आहे. मात्र ही लोकल सुटण्याच्या वेळेवर कसारा स्थानकात पोहचून 6:30 ते 6:45 दरम्यान दररोज सुटत असल्याने नियमित परतीचा प्रवास करणारे शासकीय व खासगी कर्मचारी, विद्यार्थी, व्यापारी आणि अन्य प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वास्तविक ही लोकल सीएसएमटीवरून सुटल्यानंतर कल्याण स्थानकात अगदी 4 वाजून 53 मिनिटांनी म्हणजे वेळेवर पोहचते. कल्याणहून पुढील स्थानकात पोहचण्यासाठी या गाडीला वेळेपेक्षा जास्त उशीर लागतो. त्यामुळे
या लोकलचा 72 मिनिटांचा प्रवास हा मागील सहा महिन्यापासून 100 मिनिटांवर येऊन ठेपला आहे. कल्याणात गाडी थांबवून ठेवली जाते आणि मालगाडी तसेच लांब पल्ल्यांच्या गाड्यांना मार्ग दिला जात असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.
याबाबत रेल्वे अधिकार्यांशी चर्चा करण्यात आली आहे. कल्याण–कसारा मार्गावर संध्याकाळच्या वेळेस लांबपल्ल्यांच्या मेल एक्सप्रेस गाड्या धावत असल्याने लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होत आहे. परंतु या लोकल गाड्या वेळेवर चालवण्याचा रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न सुरू आहे.
– राजेश घनघाव,अध्यक्ष–कल्याण–कर्जत–कसारा प्रवासी संघटना