नाशिक : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल घटकांच्या पाल्यासाठी इंग्रजी माध्यम शाळांमध्ये 25 टक्के राखीव जागांसाठी सोडत निघाल्यानंतर आता प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आहे. आता 14 एप्रिलपर्यंत शाळा बंदच राहणार असल्याने शाळा सुरु होण्याची वाट बघावी लागेल.
जिल्ह्यातील ४४७ शाळांमध्ये साडेपाच हजार जागांसाठी तब्बल 17 हजार 630 विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाकडे दाखल झाले होते. त्याआधारे शिक्षण विभागाने गेल्या आठवड्यात ऑनलाईन सोडत काढत जिल्ह्यातील पाच हजार 307 विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी उपलब्ध करुन दिली. उर्वरित विद्यार्थ्यांची नावे प्रतिक्षा यादीत समाविष्ठ झाली आहेत. प्रवेश यादीत स्थान मिळाले तरी जिल्ह्यातील शाळा बंद असल्यामुळे कागदपत्रांची पडताळणी अद्याप झालेली नाही. पडताळणी झाल्यानंतर प्रवेश निश्चित होणार असल्याने पालकांच्या मनात भिती कायम दिसून येते. तसेच प्रतिक्षा यादीतील पालकांनाची चिंता वाढल्याचे दिसते.