जानेवारीपासून दुबईत अडकलेले काळाराम मंदिराचे पुजारी आणि महंत सुधीरदास पुजारी यांची दूबई न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. महंतांनी व्यवसाय वृद्धीसाठी रॉयल राजघराण्याकडून ५० लाख रुपये घेतल्याचा खोटा आरोप करण्यात आला होता.
महंत सुधीरदास २३ जानेवारीपासून दुबईत होते. आठ महिन्यांनतर न्यायालयाने त्यांना पासपोर्ट दिल्याने सोमवारी (दि.९) त्यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला होता. सुटकेसाठी केंद्रसरकारसह लोकप्रतिनिधींनी मदत केली, अशी माहिती महंत सुधीरदास यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हे देखील वाचा – 62 किलो गांजा पकडला; आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
धार्मिक कार्याबरोबर व्यावसायिक अशी ओळख असलेल्या महंत सुधीरदास पुजारी यांचा पासपोर्ट २३ जानेवारीला जप्त करीत त्यांना दुबईत अटक करण्यात आली होती त्यांना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दुबई सोडण्यास मनाई करण्यात आली होती. दुबईतील एका स्थानिक भागीदाराने पैशांच्या देवाण-घेवाणीतून दुबई पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, महंत सुधीरदास पुजारी यांच्या अटकेनंतर दिल्लीतील परराष्ट्र खात्याने हालचाली सुरू करीत पुजारी यांची जामिनावर सुटका केली होती. महंत सुधीरदास यांची सुटका करण्यासाठी दिवंगत माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, खासदार हेमंत गोडसे यांनी प्रयत्न केले होते, असे सुधीरदास म्हणाले.
दुबईत बालाजी मंदिर उभारण्यासाठी २२ एकर जागा मिळणार होती. पुजारींच्या सराह इन्व्हेस्टमेंट कंपनीमार्फत मंदिरासंदर्भात देणगीसाठी बँकेत खाते उघडले होते. दुबईच्या रॉयल परिवाराशी संबंधित व दुबई इकॉनॉमिक्स फोरमचे संचालक अब्दुल वलिद यांनी पुजारींकडे प्रायोजकत्वासाठी ५० लाख रुपयांची मागणी केली. त्यांना चेकबुकसह इतर सेवासुविधा पुरविण्यात आल्या नाही. याप्रकरणी पुजारींनी खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी वलिदांनी पुजारींच्या अरबी भाषेतील कागदांवर सह्या घेतल्या. त्या अरबी पत्रांमध्ये ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा उल्लेख होता. त्यानंतर ते २३ जानेवारी रोजी दुबई विमानतळावर मायदेशी परतण्यासाठी आले असता त्यांना बुर पोलिसांनी फसवणूकप्रकरणी अटक करीत पासपोर्ट जप्त केला होता. पोलीस तपासानंतर न्यायालयीन प्रक्रियेत त्यांची दिशाभूल करीत कागदांवर सह्या घेतल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे न्यायालयाने निर्दोष सुटका केली.