नाशिक : राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता दहावीच्या भुगोलाचा पेपर रद्द केला आहे. तसेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रथम सत्रातील गुणांच्या आधारे निकाल देण्याची घोषणा त्यांनी केली. मात्र, यावर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने आक्षेप घेतला असून, सरसकट पास करण्याची मागणी केली आहे. अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी मराठी ऐवजी इंग्रजी माध्यम झाल्याने प्रथम सत्रापर्यंत विद्यार्थ्यांना इंग्रजीचे आकलन न झाल्याने परीक्षा देताना अनेक अडचणी येतात. त्यामुळे प्रथम सत्रापर्यंत त्यांना कमी गुण मिळतात. द्वितीय सत्रात प्रात्यक्षिक परीक्षेमुळे इयत्ता अकरावी उत्तीर्ण होणे अनुकूल होते. मात्र, प्रथम सत्रापर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा घेतली जात नाही. यावर्षी अकरावीचे प्रवेश विशेषत: शहरात ऑनलाईन पध्दतीने उशिरा सुरु झाले. परिणामी त्याचा फटका प्रथम सत्रातील निकालावर झालेला दिसतो. द्वितीय सत्रात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असल्याने त्याला अभ्यास व परीक्षेस वेळ मिळतो. त्यामुळे दोन्ही सत्रातील सरासरी गुणांनी तो उत्तीर्ण होतो. मात्र केवळ प्रथम सत्राचे सरासरी गुणांचा निकाल जाहीर केलेल्या धोरणामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होऊन जास्तीत जास्त विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील, अशी भिती शिक्षक महासंघाने व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर त्यामुळे 17 नंबर फॉर्मकडे विद्यार्थ्यांचा कल वाढेल. त्याचा खासगी शिकवणी घेणारे व राज्य मंडळाला फायदा होईल, अशी शक्यता त्यांनी वर्तवली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी अकरावीच्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचे धोरण जाहीर करावे, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ.संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फाजगे यांनी केली आहे.
अकरावीचे अनेक विद्यार्थी नापास होण्याची शक्यता
written By Kiran Kawade
NASHIK
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघातर्फे सरसकट पास करण्याची मागणी
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -