सपकाळ नॉलेज हबच्या विद्यार्थ्याना न्याय मिळवून देण्यासाठी जातीने लक्ष घाला, असे साकडे आमदार देवयानी फरांदे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांना घातले आहे. याबाबत लवकरच संयुक्त बैठक बोलावून या प्रश्नातून मार्ग काढू आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्वासन महाजन यांनी दिले.
सपकाळ नॉलेज हब ही संस्था गेल्या वर्षभरापासून विविध समस्यांचा सामना करत आहे. या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे वर्ग अजून सुरू झाले नसून अशीच परिस्थिती राहिली तर हबमधील सुमारे ४५०० हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या वर्षभरापासून शिक्षकांचे पगार झाले नसल्याने त्यांच्यासह शिक्षकेतर कर्मचार्यांनी पूर्णत: काम बंद सुरू केले आहे. संस्थेला मिळणारी शिष्यवृत्ती ही संस्थेच्या खात्यात जमा न होता ती विश्वास बँकेच्या कर्ज खात्यात जमा केली जात असल्याचे समजते. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आमदार फरांदे यांनी पालकमंत्री महाजन यांना याबाबत माहिती दिली. मंत्री महाजन यांनी जिल्हाधिकार्यांना या प्रकरणी तातडीने निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. पालकमंत्र्यांनी याप्रश्नी सोमवारी मंत्रालात शिक्षणमंत्री, समाजकल्याणमंत्री, अर्थमंत्री यांची संयुक्त बैठक घ्यावी, असे प्रा.आमदार फरांदे यांनी सूचवले. पालकमंत्र्यांनी त्यालाही होकार दिल्याने लवकर हा तिढा सुटला जाईल, अशी हमी यावेळी देण्यात आली.
सोमवारी जिल्हाधिकारी व मंत्रालयात काय निर्णय होतो याकडे आता ४५०० विद्यार्थी व २५० कर्मचारी यांचे लक्ष लागले आहे. प्राध्यापकांचे वर्षभरापासून पगार नसल्याने त्याची आर्थिक परिस्थिती खालावली असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे याप्रश्नी लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. यावेळी विद्यार्थी ऋषिकेश रणसिंग, चिन्मय जोशी, रोहित गायकवाड, श्रृतिका देसाई, हर्षाली देवरे, अरविंद नायडू, हिमानी कारेकर, धनश्री बोरसे, आदित्य कटाळे, जागृती पाटील, शिवदीप पाटील, शुभम बनकर, शुभम पारख अद्दिंसह पालक, विद्यार्थी उपस्थित होते.