दीड वर्षांपुर्वी मुलीचा प्रेमविवाह झाला. लग्नानंतर तिला माहेरकडील नातेवाईकांशी बोलू दिले जात नव्हते की भेटू दिले जात नव्हते. सासरकडील मंडळींनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्यानेच तिने आत्महत्या केली, तिच्या आत्महत्येस सासरची मंडळी जबाबदार आहेत, अशी फिर्याद विवाहित मुलीच्या आईने पंचवटी पोलीस ठाण्यात केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गीता (१८, रा.पंचवटी) आणि अनिलचा प्रेमविवाह १ एप्रिल २०१८ रोजी झाला. तेंव्हापासून आतापर्यंत तिला सासू, सासरे, पती अनिल पंडीत,नणंद, मामा हे सर्वजण माहेरच्या माणसांशी बोलू देत नव्हते की भेटू देत नव्हते. घरातील कामावरून सर्वजण तिला शिवीगाळ करायचे. सासरच्या मंडळींनी तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. ती आठ महिन्यांची गरोदर असतानाही सासरकडील मंडळींनी तिला आत्महत्येस प्रवृत्त केले. त्यातून तिने शुक्रवारी (ता.१२) सासरी तिने गळफास घेवून आत्महत्या केली. पोलिसांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक यु. आर. गवळी करीत आहेत.