अवघ्या दोन महिन्यात आर्थिक वर्ष संपत आल्यामुळे पाणीपट्टी वसुलीसाठी महापालिकेने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. यासाठी पालिकेने तब्बल ४६०० थकबाकीदारांचे नळकनेक्शन खंडित केले आहेत. यामध्ये नवीन नाशिक विभागातील सर्वाधिक १२४० थकबाकीदारांचा समावेश आहे.
’ना नफा ना तोटा’ तत्त्वावर महापालिकेचा पाणीपुरवठा करणे अपेक्षित असले तरी गेल्या काही वर्षात तोट्याचेच आकडे वाढत चालले आहे. पालीकेने नळजोडणीसंदर्भात रहिवासी एक लाख ८८ हजार ३९७, व्यावसायिक ३,९११, अव्यावसायिक ४,२४८ असे एकूण १ लाख ९६ हजार ५५६ नळ कनेक्शन महापालिकेने दिले आहेत. त्यांच्याकडून एकूण उद्दिष्टापैकी थकबाकीची जेमतेम २५ टक्के तर चालू बिलापोटी ४९ टक्केच पाणीपट्टी वसूल होऊ शकली आहे. अद्यापही २८ हजार ५५७ नळ कनेक्शनधारकांकडे पालिकेची तब्बल ४० कोटी २५ लाखांची पाणीपट्टी थकीत असल्यामुळे त्यांची नळजोडणी खंडीत केली जात आहे. एप्रिल २०१९ पासून आतापर्यंत ४६०० थकबाकीदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले आहेत.