‘राजकीय अस्तित्वासाठी काय पण’ म्हणत पक्षनिष्ठा वेशीवर टांगण्याची प्रथा आज सर्वमान्य झाली असताना जिल्ह्यातील एका जागी येनकेन मार्गाने विजय मिळवण्याचे ईप्सित राखलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने नाईलाजास्तव मनसेच्या इंजिनात बसण्याची तयारी केल्याची चर्चा आहे. आतापर्यंत बहुतेक सर्वच प्रमु्ख पक्षांचे दरवाजे ठोठावलेल्या या नेत्याकडे राष्ट्रवादीच्या स्थानिकांनी पाठ फिरवल्याचा मुद्दा ऐरणीवर आल्याने कोणतीही जोखीम घेण्याऐवजी मनसेकडून लढणे योग्य राहणार असल्याची त्याची खात्री पटल्याचेही बोलले जात आहे. सध्या चर्चेत असलेली ही बाब वास्तवात उतरेल का, याबाबत सार्वत्रिक उत्सुकता निर्माण झाली आहे.
राज्य विधानसभा निवडणूक उंबरठ्यावर असताना विविध पक्षीयांमध्ये लगबग सुरू आहे. आमदारकीचे तिकीट मिळवून विधानसभेत जाण्यासाठी बाशींगवीरांचीही कमी नाही. निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसा राजकीय उष्मा वर्धिष्णू होताना जाणवतो आहे. भाजप–सेना युती विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस–काँग्रेस आघाडी, वंचित बहुजन आघाडी या पक्षांचे उमेदवार निश्चितीकरण अभियान बाळसे धरताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा राजकारणात सातत्याने बोलबाला राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका बड्या नेत्याला स्वकीयांच्या असहकाराचे ग्रहण लागले आहे. स्वकीय आपल्यासोबत शरीराने असले तरी मनाने नाहीत, ही मनोमन खात्री पटलेल्या या नेत्याला मनसेचे इंजिन सुरक्षित भासू लागल्याची चर्चा आहे. गेल्या तीन वर्षांपासून लोकनियुक्त आमदारकीची स्वप्ने रंगवणाऱ्या या नेत्याला येनकेन प्रकारे यंदा हे ‘लेबल’ माथी लावायचे असल्याने त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबण्याची तयारी त्याने ठेवली आहे. सदर नेत्याच्या निर्णयामुळे आधीच गाळात गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची तर निद्रितावस्थेत गेलेल्या मनसेला उभारी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.