जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी बुधवारी (दि.17) डॉ. नरेश गिते यांच्याकडून पदभार स्वीकारताच कामकाज सुरू केले. डॉ.गिते यांनी गेल्या दीड वर्षात घेतलेल्या प्रशासकीय निर्णयांची प्रथमत: अंमलबजवणी करणार आहे. त्यासोबतच जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि आरोग्य सुविधांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावणार असल्याचे सांगत भुवनेश्वरी एस यांनी ग्रामीण भागातील समस्या जाणून घेणार असल्याचे सांगितले.
आदिवासी भागात कुपोषणाचे प्रश्न गंभीर स्वरुपात असल्याचे जाणवते. त्यावर विशेष लक्ष केंद्रित करून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नाशिक जिल्ह्यात आदिवासी व बिगर आदिवासी अशा दोन्ही तालुक्यांचा समावेश असल्यामुळे येथील वैविध्यता समजून घेणार असल्याचे भुवनेश्वरी एस यांनी सांगितले. पदभार स्वीकारताच पहिल्याच दिवशी ई-निविदा कक्षास भेट देऊन त्यांनी येथील कामकाज जाणून घेतले. विभाग प्रमुखांची बैठक घेऊन त्यांच्याकडून कामाचा आढावा घेतला. तथापि, सीईओ भुवनेश्वरी यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांच्यासह उपाध्यक्ष नयना गावित, अर्थ व बांधकाम सभापती मनीषा पवार, महिला व बालकल्याण सभापती अर्पणा खोसकर यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.