स्मार्ट सिटीअंतर्गत महापालिकेच्या वतीने मखमलाबाद – नाशिक शिवारात एकूण ७०० एकरमध्ये नियोजनबद्ध स्मार्टनगर वसवणार आहे. यासाठी नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविली जाणार आहे. या प्रस्तावला मुळातच परिसरातील शेतकर्यांचा विरोध आहे. तथापि, गेल्या महिन्यात कंपनीने यासंदर्भातील सादरीकरण शेतकर्यांना केले आणि सर्वेक्षण करू देण्याची विनंती केली होती. त्यावेळी शेतकर्यांनी काय लाभ होणार, असे विचारले असता आधी सर्वेक्षण झाले की मग त्याचे गणित मांडता येईल, असे सांगितले. शेतकर्यांंनी प्रकल्पाला विरोध दर्शवूनही अखेरीस सर्वेक्षणाला संमती दिली होती. त्यानुसार एका खासगी एजन्सीमार्फत गेल्या दहा ते बारा दिवसांपासून सर्वेक्षणदेखील सुरू केले होते. गुरुवारी (३१ जानेवारी) सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकाला गावकर्यांनी पिटाळून लावले.
शेतकरी का संतप्त?
स्मार्ट सिटी कंपनीने महासभेत हरित क्षेत्र विकासाचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यात महापालिकेने इरादा जाहीर करावा, एवढाच उल्लेख असला तरी त्यानंतर हा इरादा राजपत्रात प्रसिद्ध करण्याचीदेखील तरतूद आहे. त्यामुळे प्रस्ताव संमत झाल्यासारखेच होणार आहे. याशिवाय प्रस्तावात टीपी स्कीममध्ये सर्व जमिनी एकत्र केल्यांनतर अंतिमत: शेतकर्यांना ५० टक्के जागा देण्याचादेखील उल्लेख आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत.