मध्य रेल्वेच्या मनमाड-मुंबई या पंचवटी एक्सप्रेससह चार रेल्वे गाड्या शनिवारपासून (दि. १२) सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईकडे जाणार्या कामगार वर्गासाठी ही सुखद बातमी असली तरी, केवळ आरक्षण केलेल्या प्रवाशांनाच या गाडीत प्रवेश मिळणार आहे.
लॉकडाऊन काळात देशातील रेल्वे वाहतूक ठप्प झालेली आहे. राज्य व केंद्र शासनाच्या सूचनांप्रमाणे अनलॉक-४ सुरू आहे, शनिवारपासून (दि.१२) मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून एकूण चार रेल्वे सुरू होणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रेल्वेने सूचविलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने स्थानक प्रबंधकांना दिले आहेत. रेल्वेस्थानकांवरील कर्मचारी, प्रवाशी व नागरिकांनी मास्क, सॅनेटायझर, सोशल डिस्टन्सिंग, तसेच थर्मल स्कॅनिंगसाठी गाडी येण्यापूर्वी प्रवाशाला दीड तासांपूर्वी स्थानकावर येणे बंधनकारक असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
या गाड्या धावणार
अहमदाबाद-पुरी
बलसाड-मुझफरपूर
बेंगलोर-नवी दिल्ली
मनमाड-मुंबई पंचवटी