शहरातील उपनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचार्यानेच सावत्र मुलांवर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २१) दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत दोन्हीही मुलांचा मृत्यू झाला असून कौटुंबिक भांडण विकोपास गेल्याने हा गोळीबार झाल्याचे सांगितले जाते आहे. पोलीस नाईक संजय अंबादास भोये याने स्वत:हून पंचवटी पोलीस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अभिषेक नंदकिशोर चिखलकर (२५) आणि शुभम नंदकिशोर चिखलकर (२२) अशी खून झालेल्यांची नावे आहेत.
पंचवटीच्या पेठरोडवरील अश्वमेध नगरातील पोलीस नाईक संजय अंबादास भोये (४४) आणि सावत्र मुलांमध्ये दुपारच्या सुमारास जोरदार भांडण झाले. हे भांडण इतके विकोपाला गेले की, संजय भोये यांनी आपल्याकडील सर्व्हिस रिव्हॉल्वरने सावत्र मुलांवर चार गोळ्या झाडल्या. त्यात दोन्ही मुले गंभीर जखमी झाली. शुभमचा जागीच मृत्यू झाला. तर अभिषेकचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अभिषेक चिखलकर हा मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत होता, तर शुभम सातपूरमधील एका खासगी कंपनीत नोकरीला असून त्याचे एक महिन्यापूर्वी लग्न झाले होते. मनीषा संजय भोये यांना पहिल्या पतीकडून झालेली ही दोन्ही मुले होती. संजय भोये हे उपनगर पोलीस ठाण्यात बीट मार्शल म्हणून कार्यरत आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. गुरुवारी त्यांची साप्ताहिक सुटी होती, तर शुक्रवारी घटनेच्या दिवशी त्यांना नाईट ड्युटी होती. शुक्रवारी हॉलमध्ये मनिषा भोये मुलगी व सुनेसोबत बसल्या होत्या. मुलगा शाळेत गेला होता. त्यावेळी बेडरूमध्ये संजय भोये यांचे अभिषेक व शुभमसोबत भांडण चालू होते. भांडण विकोपाला गेल्याने संजय भोये यांनी सावत्र मुलांवर गोळीबार केला.