स्वच्छ भारत अभियानात पहिल्या दहा शहरांमध्ये नाव येण्यासाठी महापालिकेच्या वतीने युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. शहरातील प्रसाधनगृहांमध्ये चक्क आरसे आणि पेपर नॅपकीनही ठेवण्याची शक्कल आरोग्य विभागाने लढविली. जेणेकरून शहराचा ‘सच्छ चेहरा’ परीक्षकांसमोर येईल; परंतु काही उनाडटप्पूंनी पेपर नॅपकीनच्या बंडलसह प्रसाधनगृहांना लावलेले आरसेच चोरून नेल्याची बाब पुढे आली आहे.
स्वच्छ भारत सर्वेक्षण २०१९ या स्पर्धेमध्ये यंदा पहिल्या दहा क्रमांकामध्ये निवड होण्यासाठी महापालिकेचे पदाधिकारी आसुसलेले आहेत. त्यासाठी शहरातील रिकाम्या भिंती रंगविण्यात आल्या असून साफसफाई देखील दोन वेळेला केली जात आहे. दुभाजक साफ करणे, वाळलेले गवत काढणे, रिकाम्या भिंतींवर स्वच्छतेविषयीचे संदेश लिहिणे, अशी कामे अभियानाच्या पार्श्वभूमिवर करण्यात आली आहेत. याशिवाय महापौर आरोग्य अधिकार्यांच्या सतत संपर्कात असून जेथे कचरा दिसला तेथूनच त्या आरोग्याधिकार्यांशी संपर्क साधतात आणि स्वच्छतेच्या बाबतीत आदेश देतात. स्वच्छता अभियानात गुण देताना शहरातील प्रसाधनगृहे किती स्वच्छ आणि निटनेटके आहेत याचाही विचार केला जातो. त्यात कमी पडू नये म्हणून प्रशासनाने शहरातील प्रसाधनगृहांची डागडुजी केली. तोट्या नसलेल्या वाहिन्यांना तोट्या बसविल्या आहेत. विशेष म्हणजे काही शौचालयांमध्ये, तर चक्क आरसे बसविले. त्याचप्रमाणे पेपर नॅपकीनचीही व्यवस्था करण्यात आली होती; परंतु दोन दिवसांत या वस्तू गायब झाल्या असल्याने प्रशासनाने डोक्यावर हात मारून घेतला आहे.